*कोंकण एक्सप्रेस*
*साधनेने प्रारब्ध सुसह्य होते – हेमंत मणेरीकर*
*सातरल येथे सनातनतर्फे जाहीर प्रवचन*
*कणकवली-प्रतिनिधि*
हिंदु धर्मात कर्मफलसिदधांत आणि पुनर्जन्म सिद्धांत हे दोन सिद्धांत सांगितलेले आहेत. या सिदधांतानुसार केलेल्या प्रत्येक बर्या वाईट कर्माचे फळ भोगावे लागते आणि हे फळ भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. जर या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करायची असेल आणि आनंदस्वरूप मोक्षप्राप्ती करायची असेल तर साधनेला पर्याय नाही. केलेल्या पापपुण्यातून जे प्रारब्ध आपल्या वाट्याला येते ते सुसह्य होण्यासाठी योग्य साधना आपल्याला सहाय्य करते. कलियुगात नामसाधना श्रेष्ठ असून प्रत्येकाला सध्याच्या धावपळीच्या काळात सुलभतेने करता येण्यासारखी आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री.हेमंत मणेरीकर यांनी केले. तालुक्यातील सातरल- कासरल प्राथमिक प्रशालेच्या पटांगणावर आयोजित जाहीर प्रवचनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री.भास्कर काजरेकर उपस्थित होते.
श्री.मणेरीकर पुढे म्हणाले की, मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि मोक्षप्राप्तीसाठी साधना करून जन्ममृत्यूच्या फेर्यातून मुक्तता करणे या दोन कारणांसाठी होतो. आपल्या वाट्याला येणारे सुखदु:ख हे बहुधा पुर्वजन्मीच्या कर्मांचे फळ असते.
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेच्या उपासनेची आवश्यकता आहे. अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. अशा कुलदेवतेची उपासना म्हणजे नामस्मरण केल्यास आपल्या आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. माहितीला फक्त २ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे नामस्मरणाची कृती करून अनुभूती घेणे महत्त्वाचे आहे. नामजपामुळे आपले प्रारब्ध सुसह्य होते आणि सदगुरूंची प्राप्ती होते.
श्री.भास्कर काजरेकर यांनी सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती सांगितले. सनातन संस्था ही अध्यात्माचा प्रसार करणारी संस्था असून देशभरात संस्थेचे सत्संग आदी विविध माध्यमातून कार्य सुरू असल्याचे ते म्हणाले.
हेमंत मणेरीकर यांचा सत्कार कासरल गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रशांत सावंत यांनी तर श्री.काजरेकर यांचा सत्कार सातरल-कासरल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन विनोद परब यांच्या हस्ते करण्यात आला. कासरलच्या सरपंच सौ.स्नेहा विनोद परब यांचा सन्मान सनातन संस्थेच्या सौ.प्रीती चव्हाण यांनी तर सातरलच्या सरपंच सौ. सविता यशवंत मेस्त्री यांचा सत्कार सौ.सुचिता सुहास बागवे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नीना कोळसुलकर यांनी केले. प्रवचनानंतर उपस्थितांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमस्थळी संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन उभारण्यात आले होते. याचा जिज्ञासूंनी लाभ घेतला.