लाडक्या बहिणींसाठी २१०० रूपये देण्याचे मान्य करूनही अर्थसंकल्पात याबद्दल एकही शब्द नसल्याने अर्थसंकल्प फसवा सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम

लाडक्या बहिणींसाठी २१०० रूपये देण्याचे मान्य करूनही अर्थसंकल्पात याबद्दल एकही शब्द नसल्याने अर्थसंकल्प फसवा सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम

*कोंकण एक्सप्रेस*

*लाडक्या बहिणींसाठी २१०० रूपये देण्याचे मान्य करूनही अर्थसंकल्पात याबद्दल एकही शब्द नसल्याने अर्थसंकल्प फसवा सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम*

*ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका*

*मालवण  प्रतीनिधी*

बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द एकनाथ शिंदे पाळू शकत नाहीत, मग लाडक्या बहिणींचा तर प्रश्नच दूरचाच आहे. महायुतीकडून निवडणूक काळात लाडक्या बहिणींसाठी २१०० रूपये देण्याचे मान्य करूनही अर्थसंकल्पात याबद्दल एकही शब्द नसल्याने अर्थसंकल्प फसवा सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करणारा आहे अशी टीका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

मालवण तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नितीन वाळके, दीपक देसाई, तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, महेश सुर्वे, सुरेश मडये, युवती सेना जिल्हाअधिकारी निनाक्षी शिंदे, तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री खोबरेकर म्हणाले, शासनाचा पैशाचा वापर करून महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून शासनाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आणि तदनंतर पंधराशेचे २१०० करू असे जाहीर केले होते. लाडक्या बहिणी रक्कम वाढवून देण्याचे आश्वासन निवडणूक काळामध्ये सरकारने दिले होते. मात्र कालच्या अधिवेशनामध्ये या योजनेचा फायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी शासनाने पारदर्शक पद्धतीने योजना राबवली नाही हे सरकार मान्य करत असल्याने ही योजना राबवताना पारदर्शकता तुम्ही का ठेवली नाही हा प्रश्न आमचा असल्याचे श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत. हा शब्द त्यांनी पाळला नाही, तर लाडक्या बहिणींसाठी कसा शब्द पाळतील असाही टोलाही त्यांनी लगावला.

बेकायदेशीर मासेमारी थांबविण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापर करण्यात येत होता मात्र सध्या काही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर ड्रोन चालविणारे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ फक्त दिखाऊपणा करण्यासाठी ड्रोन दाखविण्यात आले होते. मच्छीमारांना एका बाजूने दाखवायचे की आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी आहोत आणि दुसऱ्या बाजूला बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यवसायिकांची पाठराखण करायची हे काम मात्र आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका हे सरकार या ठिकाणी घेत आहे. मत्स्य व्यवसाय मंत्र्यांच्याच जिल्ह्यातील अनेक बंदरांमध्ये बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन बोटी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविले जात नसल्याचाही आरोप श्री. खोबरेकर यांनी केला.

ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा आपण कोरा केला होता तसाच सातबारा या ठिकाणी एनसीडीसी ट्रॉलरधारकांचा झाला पाहिजे. मात्र शासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. शासनाकडून फक्त मोठमोठ्या घोषणा करायच्या परंतु एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केल्या जात नाही. दिल्लीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक करताय परंतु महाराष्ट्रातील अरबी समुद्रामधील स्मारकाची तुम्ही सुरुवात केली होती. तुम्ही महाशक्ती आहात. केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे. आज महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. तरीसुद्धा अरबी समुद्रातील स्मारक आजही या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही ही मात्र शोकांतिका प्रत्येक महाराष्ट्रवासीयाच्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये आहे. परंतु नवनवीन घोषणा करायच्या आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे, असाही आरोप श्री. खोबरेकर यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी आम्ही प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत. ठाकरे शिवसेनेने कोकणाला काय दिलं? असे विरोधक विचारत आहेत. तर विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे कोकणावर किती प्रेम आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. या पुढच्या काळामध्ये कोकणात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्प असतील तर त्याला आमचा विरोधच राहिल आणि विधायक प्रकल्प असतील तर त्याला आमचे सहकार्य राहिल असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत, असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!