कोंकण एक्सप्रेस
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात – विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
मुंबई
उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी आज सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे.
अधिवेशनाच्या आधीच आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अंबदास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना देखील दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल झाले आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मालाडमध्ये घटना घडली आहे, बदलापूरमध्ये घटना घडली, अमरावतीमध्येही घटना घडली, सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. हा वाद सोडवण्यासाठी एका बैठकीला मुख्यमंत्री जातात तर उपमुख्यमंत्री जात नाहीत. या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही.
त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तर आज राज्यात परिस्थिती अशी आहे की, गुन्हेगारी करा, भ्रष्टाचार करा, अपमानजनक बोला, तुम्हाला लगेच वरची पदं मिळतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. अशी विचारणा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली.
तर मुख्यमंत्री विरोधकांबरोबर संवाद ठेवत नाहीत. सत्तेचा माज आणि माग्रुरी चेहऱ्यावर दिसून येत आहे. महाराष्ट्रची राजकीय संस्कृती आहे, ती बदलत चालली आहे.
जोपर्यंत विरोधकांना त्यांचा जो मान आहे, तो दिला जात नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.