*कोंकण एक्सप्रेस*
*तिलारी धरणाचा दोडामार्ग वासियांना फायदा काय : शेकडो एकर जमीन देवून घर दार सोडून विस्थापित झालेली गाव आजही पाण्यापासून वंचित -ॲड अनिल केसरकर*
*धरणाचं पाणी कोट्यावधी रुपये खर्च करून शासनकर्त्यानी वेंगुर्ल्यात पोचवलं ते केवळ मायनिंग कंपन्यांचे लाड पुरविण्यासाठीच*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पासाठी अनेक गावे प्रकल्पबाधित झाल्यानंतर पुनर्वसनाच्या गोंडस नावाखाली अन्यत्र वसविण्यात आलीत मात्र हि पुनर्वसन केलेली गावे तसेच दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये मार्च महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ज्या तिलारी धरणासाठी अनेक गावे उठविण्यात आली होती.त्या धरणाचा म्हणावा तसा फायदा दोडामार्ग वासियांना झालेला नाही. आजही धरणालगतच्या अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो हि शोकांतिका आहे. या धरणाच्या डावा व उजवा कालवा दुरुस्तीच्या नावाखाली काहि ठेकेदार अधिकारी मालामाल झालेत. मात्र या धरणाच्या दुरुस्तीच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यामुळे आजही कालवे फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. धरण उशाशी असून देखील अनेक गावांमध्ये शेतकरीवर्ग पाण्यापासून वंचित आहे.
या शेतकऱ्यांना धरणाचे पाणी कसे मिळेल याचा शासनकर्ते व अधिकारी वर्गाने एकत्रित बसून अभ्यास करायला हवा होता मात्र हे अधिकारी धरणाचं पाणी वेंगुर्ले तालुक्यात पर्यावरणाची प्रचंड हानी करणाऱ्या मायनिंग कंपन्यांना कसे मिळेल यासाठी आपली मेहनत वाया घालवत होते. या मायनिंग कंपन्यांचे लाड पुरविणाऱ्या अधिकारी वर्गाने दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे, खोक्रल , उसप, झरेबांबर, केर, मोर्ले, माटणे यासह अन्य गावातील शेतकरी वर्गाला तिलारी धरणाचे पाणी कसे सुरळीत मिळेल यासाठी लवकरात लवकर अभ्यास करावा योग्य नियोजन करावे अन्यथा या धरणाच्या दुरुस्तीच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरणाऱ्या अधिकारी वर्गाला जाब विचारण्याची गरज आहे. दरम्यान प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केल्यास या आंदोलनात मनसे पूर्ण ताकतीने सहभागी होणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.