कोल्हापुरातील वाहतूक कोंडी सुटणार; शिवाजी पूल ते तावडे हॉटेल उड्डाणपूलला मान्यता

कोल्हापुरातील वाहतूक कोंडी सुटणार; शिवाजी पूल ते तावडे हॉटेल उड्डाणपूलला मान्यता

*कोंकण एक्सप्रेस*

*कोल्हापुरातील वाहतूक कोंडी सुटणार; शिवाजी पूल ते तावडे हॉटेल उड्डाणपूलला मान्यता*

*कोल्हापूर : प्रतिनिधी*

शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल या मार्गावर उड्डाणपूल (Kolhapur Flyover) उभारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी कोल्हापूर विमानतळावर मंत्री गडकरी यांनी जिल्ह्यातील विविध रस्ते विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

खा. धनंजय महाडिक आणि आ.अमोल महाडिक यांनी कोल्हापुरातील पर्यटकांची वाढती गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. गडकरी यांनी या मागणीला सहमती दर्शवली असून, युटिलिटी शिफ्टिंग आणि भूसंपादनाचा खर्च महापालिका व राज्य शासनाने करावा, तर 6.8 किमी लांबीच्या पुलासाठी सुमारे 625 कोटी रुपये खर्च केंद्र सरकार करेल, असे स्पष्ट केले आहे.

रस्ते विकास आणि उड्डाणपूल प्रकल्प शिरोली ते उचगाव (4.25 किमी) आणि कागल (1.8 किमी) येथे पिलर पूल उभारण्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत. कोल्हापुरात बास्केट बी-ज या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून, त्याची उंची वाढवून सविस्तर आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आजरा आणि गडहिंग्लज शहरांमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या शहरांभोवती रिंग रोड करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

शिवाजी पूल ते केर्ली रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या अनुषंगाने शिवाजी पूल ते केर्ली या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापुरात हा रस्ता पाण्याखाली जाऊ नये यासाठी उंची वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी सहा ठिकाणी बॉक्स कल्व्हर्ट तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरण 2025 पर्यंत पूर्ण करणार पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामास गती देऊन डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी बालिंगे ते आंबेवाडी या मार्गावर रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी सेवा मार्ग आणि भुयारी मार्ग आंबा ते पैजारवाडी परिसरात स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून 7 किमी लांबीचा सेवा मार्ग आणि 5 ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, पैजारवाडी ते चोकाक परिसरातील वाहतुकीसाठी 17 किमी लांबीचा सेवा मार्ग आणि 5 ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे.

या बैठकीस खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!