*कोंकण एक्सप्रेस*
*साटेली- भेडशी येथे गव्यांचा वावर ; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान*
*दोडामार्ग : शुभम गवस*
गेल्या काही दिवसांपासून साटेली- भेडशीत गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांचा कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. नाचणी, वायंगणी भात शेती, कडधान्य यांसारख्या पिकांचे गव्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यां मधून केली जात आहे.
साटेली- भेडशीत गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होत आहे.एकदा शेतीत गव्यांचा कळप घुसल्यानंतर पीक पूर्ण फस्त केल्याशिवाय ते बाहेरच पडत नाही. सायकांळी उशिरा किंवा पहाटे लवकर गवे शेतीचे नुकसान करतात. त्यातच हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतीचे नुकसान होत असतानादेखील शेतकरी काहीच करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा व गव्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.