शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गुंजणार गर्जा महाराष्ट्र माझा ! सर्व शाळांमध्ये राज्यगीत बंधनकारक: शिक्षणमंत्री दादा भुसे

शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गुंजणार गर्जा महाराष्ट्र माझा ! सर्व शाळांमध्ये राज्यगीत बंधनकारक: शिक्षणमंत्री दादा भुसे

*कोंकण एक्सप्रेस*

*शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गुंजणार गर्जा महाराष्ट्र माझा ! सर्व शाळांमध्ये राज्यगीत बंधनकारक: शिक्षणमंत्री दादा भुसे*

*नाशिक : प्रतिनिधी*

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हटले गेले पाहिजे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विभागीय शिक्षक आढावा बैठकीत दिले.

या वेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे, शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे, तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण योजनेचे प्राचार्य व आदर्श शिक्षक हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

भुसे म्हणाले की, सर्व विभागातील शाळांचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. यासोबत मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे असावीत.

त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ही शहरात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. मुलांना शाळेत देण्यात येणारा आहाराचा दर्जा उत्तम असावा.मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या शाळांना संरक्षक भिंती नाहीत, त्यांनी त्या नरेगाच्या माध्यमातून करून घ्याव्यात.

शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांनी शाळांना भेटी द्याव्यात व भेटीद्वारे शाळांची गुणवत्ता तपासणीसोबतच त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबी व अडचणी दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात इतर विभागांचे अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

त्यादृष्टीने विभागातील सर्व शाळांनी मुलांचे अध्ययन व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करावेत.ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये स्थलांतरामुळे अडचणी निर्माण होतात.या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये व त्यांचे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

विभागात आगामी काळात होणाऱ्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व शाळांनी आवश्यक तयारी करावी. शाळांमध्ये आवश्यक सेवासुविधा व भौतिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता होऊ शकते.लोकसहभाग, जिल्हा परिषद सेस निधी, क्रीडा विभाग, सेवाभावी संस्था, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, जिल्हा पातळीवरील मोठे उद्योग यांच्या सीएसआर निधीतून ही कामे करणेही शक्य असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!