*कोंकण एक्सप्रेस*
*महायुतीचे सरकार हे अतिरिक्त मतावर डल्ला मारून आलेले सरकार*
*काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, श्रीरंग बरगे यांचा आरोप*
*कुडाळ : प्रतिनिधी*
निवडणूका या निष्पक्षपाती व पारदर्शक घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे,पण त्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना बेइमानी केल्याची अनेक उदाहरणे असून महायुतीचे सरकार म्हणजे अतिरिक्त मतावर डल्ला मारून निवडून आलेले सरकार आहे.असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी कुडाळ येथील शासकिय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.ते आज कुडाळ येथे मतदार दिना निमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मतदार जागृती केली जात आहे. त्या निमित्ताने ते कुडाळ येथे आले होते.
निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था स्वायत्त आहे. पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचे पूर्वीचे निकष बदलून भाजपच्या कार्यकर्त्या सारखा काम करणारा आपल्या मर्जीतील निवडणूक आयुक्त नियुक्त करता येईल अशा प्रकारचे निवडणूक आयोगाच्या नियुक्तीचे निकष बनवून आपल्या मर्जीतील राजीवीकुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे आणि राजीवीकुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी सहा महिने लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या संपूर्ण महाराष्ट्रात महायुती विरोधात जनतेच्या मनामध्ये असंतोष होता आणि ते निवडणूकीत दिसून आले मग पाच महिन्यात असा काय चमत्कार घडला आहे? अशी कोणती गोष्ट झाली असा प्रचंड विजय महायुतीला मिळाला? अशी शंकाही बरगे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. श्रीरंग बगरे पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव यांनी घेतलेल्या प्रेसला यावेळी, जिल्हाध्यक्ष ईर्ष्याद शेख, नागेश मोर्ये, साईनाथ चव्हाण, मेघनाथ धुरी, केतनकुमार गावडे, पांडुरंग नाटेकर, अरविंद मोंडकर,प्रवीण वरुणकर,अजिंक्य गावडे,जेम्स फर्नांडिस,आय वाय शेख,प्रदीप मांजरेकर,श्रीकृष्ण तळवडेकर,निलेश मलांडकर अन्य उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश हे राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अनाकलनीय आहे. महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट नसताना सहा महिन्याभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकिय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतेला पडला आहे. असेही या वेळी बोलताना बरगे यांनी सांगितले.
महाराष्ट्रा विधानसभेच्या निवडणूका या निष्पक्ष व पारदर्शकपणे झालेल्या नाहीत.लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यात घोटाळा करण्यात आला. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणूक या सहा महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात 50 लाख मतदार कसे वाढले. 2019 ची निवडणूक आणि 2024 ची निवडणूक या पाच वर्षात 5 लाख मतदार वाढले होते. मग 2024 ची लोकसभा निवडणुक ते विधानसभा निवडणूक या सहा महिन्यातच 50 लाख मतदार कसे वाढले. वाढलेल्या मतांचा डेटा संशयास्पद आहे. विधानसभा मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर वाढलेली 76 लाख मते सुद्धा संशयास्पद आहेत. या संदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे वाढीव मतांचे पुरावे मागितले परंतू निवडणूक आयोगाने पुरावे दिले नाहीत. ही मते कशी वाढली याचे उत्तर निवडणूक आयोग आजही देऊ शकले नाही. यामुळे यात काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट दिसत आहे. असेही त्यांनी सांगितले.
मतदारांच्या मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडा टाकला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष, पारदर्शक निवडणूका घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम रहावी असे काम करावे. परंतू निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लोकशाहीला घातक आहे.असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.