*कोकण Express*
*हीच ती वेळ ‘युगानुयुगे तूच’ नाटक समजून घेण्याची*
*अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ नाटकाच्या चर्चेत रसिकांचा विश्वास*
*रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शन, निलेश पवार यांचा अभिनय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र माणूस समृद्ध करण्यारा विचार दिला. आम्ही मात्र जाती भेदाचे राजकारण करत राहणाऱ्यांच्या मागे मागे धावत राहिलो.त्यामुळे बाबासाहेबांवरील ‘युगानुयुगे तूच’ हे नाटक समजून घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे
असा विश्वास नाट्यरसिकांनी येथे व्यक्त केला.
बाबासाहेबांच्या विचारविश्वावर कवी अजय कांडर यांनी लिहिलेल्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केलेले नाटक अभिनेते निलेश पवार यांनी शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात दमदारपणे सादर केले. त्यानंतर झालेल्या रसिक संवाद मध्ये लेखक आणि अभिनेत्यांबरोबरच नाटकाचे निर्माते विकास तांबे,नाटकाचे पार्श्वसंगीतकार मकरंद कदम, प्रकाश योजनाकार संजय तोडणकर आदीही सहभागी झाले होते. यावेळी रसिकांनी आजचा प्रयोग पहाणे आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा जाणीव झाली की आपण समाजात वावरताना खुलेपणाने महामानवांच्या विचाराकडे बघायला हवे. या नाटकातून बाबासाहेबांबद्दल केलेले भाष्य व त्यांचे विचार आणि या विचारांची प्रगल्भता प्रत्येकाने आत्मसात व प्रसारित करणे ही आजची गरज आहे.हे सर्व एका नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून दिले गेले अशी भावना व्यक्त केली.
‘युगानुयुगे तूच’ हे काव्य लिहावं आणि याचा नाट्य प्रयोग का करावासा वाटला? या प्रश्नावर बोलताना श्री कांडर म्हणाले, आजच्या काळात बाबासाहेब सर्वांचे कसे आहेत आणि त्यांचे विचार सर्वांनी अंमलात आणला तर माणसामाणसातील भेद कसा दूर होऊ शकतो हे सांगणे गरजेचे होते.कुठल्याही महामानवाला एकाच जातीत बांधता येत नाही. त्याचबरोबर बाबासाहेबांचे विचार समग्र मानव कल्याणचे कसे आहे हे सांगनेही गरजेचे असल्यामुळे ही कविता लिहिली गेली.
अभिनेते श्री पवार म्हणाले,युगानुयुगे तूच या काव्यात अगदी नेमक्या आणि सहज सोप्या भाषेत बाबासाहेब सांगितले गेले आहेत. जे सर्वसामान्यांनाही समजू शकतं.त्याचे नाट्य रूपांतर झालं तर ते अधिक प्रभावीपणे अधिकाधिक लोकांपर्यंत जास्त परिणामकारकपणे पोचू शकते. या विचारांतून या काव्याचे नाट्यरूपांतर सादर करण्यात येत आहे. बाबासाहेब एका समाजाचे आहेत असं म्हणणं चुकीचं ठरतं. या पार्श्वभूमीवर युगानयुगे तूच ही दीर्घ कविता आपल्याला तपासता येते.खूप बारीक बारीक तपशील या कवितेत आहेत. जे तपशील आपल्याला समग्र मानवतेकडे घेऊन जातात.या कवितेची संहिता नाट्यरूपात रंगमंचावर सादर करणे हे माझ्यासाठी आव्हान होते. परंतु दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून त्यांच्यात दिग्दर्शनामुळे ही संहिता सादर करणे मला जमू शकले.
शेती जर उद्योग म्हणून पुढे आली असती तर… या वाक्या संदर्भाने बाबासाहेबांचे विचार या नाटकात येतात असा प्रश्न डॉ. शमिता बिरमोळे यांनी केला. या संदर्भाने बोलताना श्री कांडर म्हणाले बाबासाहेबांचा शेती विचार अमलात आला असता तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली नसती.कारण बाबासाहेबांनी शेती व्यावसायिक दृष्ट्या केली जावी असा विचार मांडला. त्यासाठी सामुदायिक शेती ही कल्पना त्यांची होती. पण दुर्दैवाने त्यांच्या या विचाराकडे दुर्लक्ष केला गेला आणि इथला शेतकरी अधोगतीकडे जाऊ लागला.
या काव्यात बाबासाहेबांचा केलेला एकेरी उल्लेख या संदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा विकास तांबे आणि निलेश पवार म्हणाले,
बाबासाहेब इथल्या प्रत्येक भारतीय माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. ते इतके जवळचे आहेत की, त्यांना माऊलीची उपमा दिली गेलीय.कुणी माझा भीम म्हणतोय. माणूस जितका जास्त आपल्या जवळचा तितका सहज आपण त्याचा एकेरी उल्लेख करतो. अनेक महामानवाना आपण एकेरी संबोधतो. त्यामागे त्यांचा अवमान नसतो तर आपुलकीचा अधिकार असतो!

