*कोंकण एक्सप्रेस*
*वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
वाचनाचा व्यासंग निर्माण व्हावा व वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन आदेशानुसार ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत करूळ येथील नाथ पै ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ग्रंथालय व नाथ पै ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या वतीने वाचन संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कणकवली येथील प्रतिभावान लेखक,कवी संगीतकार तसेच चित्रकार अशा सर्वगुणसंपन्न असलेल्या श्री महेश काणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लेखक श्री महेश काणेकर यांच्याशी संवाद साधला. संवाद व त्यासोबत त्यांची प्रकट मुलाखत देखील घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक व प्रेरणादायी उत्तरे देऊन श्री महेश काणेकर यांनी मार्गदर्शन देखील केले. प्रत्येक लेखकाला वाचनाची गरज आहे या मुद्द्याच्या आधारे विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व श्री काणेकर यांनी पटवून दिले. साहित्याला कलेची जोड देऊन नवनिर्मिती करता येते याविषयी आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले, व्यसनापेक्षा व्यासंग महत्त्वाचा हे सांगताना स्वतःच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांनी उलगडले. या कार्यक्रमांमध्ये पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ग्रंथालय करूळच्या ग्रंथपाल कु.रूपाली शेटये, सहाय्यक श्रद्धा केसरकर,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण नारकर सर, प्रशालेचे शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सिद्धेश खटावकर सर, शिक्षिका सौ सरिता ठाकूर, माजी विद्यार्थी प्रतिक बेळणेकर, व प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यामध्ये कु. कामया राणे, हर्षदा वर्दम,वैष्णवी सुतार, रिया परब, समीक्षा चव्हाण, समीक्षा गोसावी, नेहा सावंत, कृतिका सावंत, प्रांजल पाटील, साक्षी निकम इत्यादी विद्यार्थिनींनी प्रश्न विचारून लेखकांना बोलते केले. कार्यक्रमाची सांगता श्री महेश काणेकर यांच्या सुमधुर गीतांनी झाली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री सिद्धेश खटावकर यांनी केले तर आभार कु रूपाली शेटये यांनी मानले.