*कोंकण एक्सप्रेस*
*बीएसएनएल सेवा सुरळीत करा अन्यथा युवासेनेचा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ नगर पंचायत सभापती मंदार शिरसाट यांनी दिली.
बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे.सुरुवातीपासून जिल्ह्यात या एकाच कंपनीची सेवा सुरु होती.त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राहक बीएसएनएल ग्राहक आहेत.मात्र केंद्र सरकारने मोबाईल सेवा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी बीएसएनएलचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे, असा आरोप मंदार शिरसाट यांनी केला.
ठराविक उद्योगपतींची भरभराट व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.त्यामुळेच बीएसएनएल सक्षम होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नादुरुस्त झालेले मोबाईल टॉवर्स जाणीवपूर्वक दुरुस्त करण्यात येत नाहीत.
शिवसेनेचे विनायक राऊत खासदार असताना त्यांनी जिल्ह्यात मोबाईल टॉवर मंजूर करून घेतले होते. मात्र त्याच्या पूर्ततेकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. मोबाईल सेवेची अशी अवस्था असताना लँड लाईन सेवा देखील मृतवत झाली आहे. मोबाईल आणि लँड लाईन सेवा शेवटच्या घटका मोजीत असल्यामुळे इंटरनेटची सुविधा घेण्यात देखील अडथळे येत आहेत.

