*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हयात आंबा भरपाई न मिळाल्यास उपोषणाचा इशारा*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्गात १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत वेगाच्या वाऱ्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे होऊनही भरपाई मिळालेली नाही. येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई जमा न झाल्यास २३ डिसेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, २०२३-२४ मधील पुनर्रचि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक योजनेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या आंबा पिकांचे वेगाच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन रितसर पंचनामे झाले.मात्र अनेकदा पत्र देऊनही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. १६ एप्रिल ते १५ मेदरम्यान वेगाच्या वाऱ्यांमुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे जिल्हा विमा प्रतिनिधी, वेंगुर्ले तालुका कृषी सहायक यांनी बागेत जाऊन पंचनामे केले होते. परंतु विमा कंपनीने जमा केलेल्या नुकसान भरपाईमध्ये तापमान व पावसाची भरपाई दिसत आहे. त्यामध्ये वेगाच्या वाऱ्याने झालेली नुकसान भरपाई जमा झालेली दिसून येत नाही.
येत्या आठ दिवसांत रितसर पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा न झाल्यास २३ डिसेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, अशा इशारा राय यांच्यासह जयवंत सावंत, संतोष शेटकर, पराग सावंत आदींनी दिला आहे.