विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणातून यशाकडे जावे – पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणातून यशाकडे जावे – पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे

*कोंकण Express*

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणातून यशाकडे जावे – पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे*

*असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार ; सातत्यपूर्वक अभ्यास केल्यास कुठलेही यश दूर नसते…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोकणातील विद्यार्थी खूप हुशार आहेत, या विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये शासकीय नोकर भरती मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत जिल्ह्यातील आलेले उमेदवार हे मार्गदर्शनाअभावी मागे पडले आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून टाईम टेबल बनवत चांगला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.सातत्यपूर्वक अभ्यास केल्यास कुठलेही यश दूर नसते.असलदे गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणातून यशाकडे जावे असे प्रतिपादन कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे यांनी केले.

असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपिठावर नायब तहसीलदार मंगेश यादव ,मंडल अधिकारी दिलीप पाटील,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , पोलीस आर.एस.जांभळे,पोलीस पाटील सावित्री पाताडे ,ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे , सुवर्णा दळवी, आनंदी खरात ,सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब ,दिनेश शिंदे,शिक्षक दिनेश जंगले,रघुनाथ लोके , देवेंद्र लोके, प्रदिप हरमलकर ,अजय परब, प्रविण डगरे,उत्तम नरे,राजू देसाई,वासुदेव दळवी,कोतवाल मिलिंद तांबे,ग्रामसेवक संजय तांबे ,ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब , प्रकाश वाळके , सायली दळवी, सत्यवान घाडी,प्रतीक्षा परब आदींसह पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे म्हणाले,विद्यार्थ्यांनी परिस्थितीच्या अडचणी डोळ्यासमोर न आणता कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्याची गरज आहे. येथील विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. या विद्यार्थ्यांनी गावाचे आणि जिल्ह्याचे नावलौकिक वाढवण्यासाठी अपार कष्ट केले पाहिजेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक तहसीलदार यासारख्या विविध पदांवर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले पाहिजे.मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाची सवय लावली पाहिजे .विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्वक अभ्यास केल्यास यश दूर नसते,एकदा का अधिकारी पदाची खुर्ची मिळाली की, आपली समाजात प्रतिष्ठा वाढते. सगळे मित्र आणि गावकरी मंडळी व नातेवाईक आपला नेहमी सन्मान करतात,हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या सत्काररुपी जबाबदारीची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे.

नायब तहसीलदार मंगेश यादव म्हणाले,दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपला झालेला गौरव लक्षात ठेवून अधिक जबाबदारीने अभ्यासाकडे वळले पाहिजे. भविष्यात अधिकारी किंवा व्यावसायिक होण्यासाठी शिक्षण घेऊन यशाची वाटचाल करावी.

मंडल अधिकारी दिलीप पाटील म्हणाले,खरी तीर्थक्षेत्र कुठली असतील ती शाळा आणि हायस्कूल आहेत. विद्यार्थी आपला ग्रामीण भागातील आहे, ग्रामीण भागातून सुद्धा चांगले विद्यार्थी घडवले जातात. इथला विद्यार्थी संघर्ष करत गेल्यानंतर तो कुठल्याही स्पर्धेमध्ये थांबत नाही. डामरे गावातील विद्यार्थीनी मराठी माध्यमातून शिकूनही तहसीलदार पदापर्यंत पोहोचू शकली असं येथीलच उदाहरण आहे.विद्यार्थ्यांना संस्कारक्षम जीवन जे आहे, ते आपल्याला खेडे गावातच मिळते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, पण आपण अंतिम टोक गाठलं पाहिजे. त्यामुळे संघर्षाची ध्येयाची भावना मुलांनी ठेवावी. आधुनिक युग आहे मोबाईलचा चांगल्या प्रकारे वापर करावा.

प्रास्ताविकात सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले , दरवर्षी विकास सोसायटी आणि असलदे ग्रामपंचात यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी हा सोहळा आयोजित केला जातो.आजचे विद्यार्थी उद्याचे आमच्या गावचे भविष्य आहेत.विद्यार्थ्यांना चांगले करीयर करीत असताना सोसायटीच्या माध्यमातून लागणारी मदत केली जाईल.विद्यार्थ्यांनी यशात हुरहुरुन न जाता यशाचे सातत्य टिकवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.

या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे,नायब तहसिलदार मंगेश यादव,मंडल अधिकारी दिलीप पाटील हे उपस्थित राहिल्याबद्दल गावच्यावतीने सरपंच चंद्रकांत डामरे यांनी शाल, पुष्गुच्छ देवून सत्कार केला.पीएचडी केल्याबद्दल जयवंत पाताडे यांचा सत्कार करण्यात आला. गावातील गुणवंत ३६ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू,पेन,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार सरपंच चंद्रकांत डामरे यांनी मानले. सुत्रसंचालन ग्रामसेवक संजय तांबे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!