*कोंकण Express*
*राजर्षी उपाधी शाहू महाराजांच्या कार्यामुळे समृद्ध झाली.*
*डॉ. संतोष रायबोले*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये सांस्कृतिक विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन कऱण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. संतोष रायबोले बोलत होते. घाटगे घराण्यातील दत्तक यशवंताने बहुजन समाजाला यशवंत केले आणि शाहू हे नाव आपल्या कर्तुत्वाने समाजप्रिय केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना मिळालेली राजर्षी उपाधी सार्थकी ठरली. धाडसी खेळांची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. अवघे ४८ वर्षे जीवन लाभलेल्या या राजाने स्वकर्तुत्वाने किती जगलो यापेक्षा कसे जगावे हे दाखवून दिले. भारताबाहेर सुद्धा या राजाचा डंका वाजला. त्यांच्या विचारसरणीतला व कार्यातला पुरोगामीपणा सर्वश्रुत आहे.
परंपरागत जातीच्या वाट्याला आलेलेच व्यवसाय केले पाहिजेत हे बंधन त्यांनी झुगारून देण्यासाठी समाजात काम केले. हे सगळं अशिक्षितपणामुळे होते त्यामुळे बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. शिक्षणासाठी वसतीगृहांची निर्मिती केली. मागासवर्गीयांना शिक्षणात ५० टक्के आरक्षण दिले. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. विधवाची अवहेलना प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाहाला कायद्याने संरक्षण दिले. बहुजनांनी उद्योगाकडे वळले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बहुजनांना न्याय देण्याचे काम केले म्हणून ते लोकराजा राजर्षी झाले. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले की, शाहू महाराजांनी शिक्षणाचा केलेला प्रसार आणि प्रचार मोठा आहे. समाजाच्या प्रगतीची नाळ ओळखून त्यांनी काम केले. त्यामुळे समाजाला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या उपयुक्त काम झाले. आजच्या काळातही शिक्षणाचा प्रसार आणि प्रचाराची आवश्यक आहे, ते काम आपण केले तरच शाहूंचे कार्य पुढे नेण्याचे काम होईल, अशी सदिच्छा व्यक्त केली.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.