असाक्षरांची नोंदणी 15 जुलैपर्यंत पूर्ण करावी

असाक्षरांची नोंदणी 15 जुलैपर्यंत पूर्ण करावी

*कोंकण Express*

*असाक्षरांची नोंदणी 15 जुलैपर्यंत पूर्ण करावी*

*-जिल्हाधिकारी किशोर तावडे*

*सिंधुदुर्गनगरी दि. 19 (जिमाका) :*

केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शाळांना दिलेल्या उदिष्टानूसार आपल्या कार्यक्षेत्रातील वय 15 वर्षांवरील सर्व असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर 15 जुलै 2024 पर्यंत पूर्ण करुन अध्ययन अध्यापन वर्ग सुरु करण्यात यावे. तसेच शाळांनी त्यांना दिलेल्या उदिष्टाइतके असाक्षर शाळेच्या कार्यक्षेत्रात नसल्यास तसे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांना सादर करावे. कोणत्याही परिस्थितीत दि.15 जुलै 2024 नंतर असाक्षर व असाक्षरांच्या संख्येनुसार आवश्यक स्वंयसेवक यांची नोंदणी प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहेत.
केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2024-25 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय नियामक परिषदेची बैठक जिल्हास्तरीय नियामक परिषद, नव भारत साक्षरता कार्यक्रम अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
गतवर्षी सन 2023-24 मधील दि.17 मार्च 2024 रोजीच्या 225 असाक्षरांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी दिली व 225 असाक्षर चाचणीत उत्तीर्ण झाले. सन 2023-24 मध्ये या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यास देण्यात आलेल्या सुधारित 691 उद्दिष्टापैकी केवळ 225 असाक्षरांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीस प्रविष्ठ असल्यामुळे सन 2024-25 मध्ये जिल्ह्यास देण्यात आलेले 4721 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्या अनुषंगाने तालुकानिहाय वाटप करण्यात आलेले उद्दिष्ट शाळानिहाय वितरीत करण्यात यावे.
शाळांनी दिलेल्या माहितीबाबत 10 टक्के शाळांची तपासणी करून तपासणीवेळी एखाद्या शाळेने असाक्षर नसल्याबाबत प्रमाणित केले असल्यास, त्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अशा शाळा भेटीवेळी असाक्षर नसलेबाबत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थितीनुसार शाळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विशिष्ट भागात असाक्षरांचे अधिक प्रमाण विचारात घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करून त्या भागातील सर्व असाक्षरांची नोंदणी 15 जुलै 2024 पर्यंत पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.
गतवर्षी करण्यात आलेल्या असाक्षरांच्या सर्वेक्षणानुसार व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, BLO (मतदान केंद्रस्तर अधिकारी) यांच्याकडून असाक्षरांची माहिती घेऊन अशा असाक्षरांना शाळांद्वारे उल्लास ॲपवर नोंद करण्यात यावे. सन 2024-25 या वर्षातील माहे ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीसा 100 टक्के असाक्षरांची उपस्थिती राहील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
दि. 6 व 7 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र शासनाच्या वतीने देश पातळीवर असाक्षरांसाठी उल्लास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या धर्तीवर माहे जुलै 2024 मध्ये राज्यस्तरावर उल्लास मेळावा असून त्याचे ठिकाण व दिनांक राज्य शासनाकडून निश्चित केले जाणार आहे. राज्यस्तरीय मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यक्रमांतर्गत झालेल्या कार्यवाहीचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!