*कोकण Express*
*नेरूर विभागात भारतीय जनता पक्षा मधून कोणीही अन्य पक्षात प्रवेश केला नाही…*
*स्वतःचीच पाठ स्वतः थोपटणा-यांनी सिद्ध करून दाखवावे*
*पंचायत समिती सदस्य संदेश नाईक*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कालच नेरूर विभागातील भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अशी खोटी बातमी सर्व ठिकाणी प्रसारित केली जात आहे. मात्र भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी कोणत्याही अन्य पक्षात प्रवेश केलेला नसून कालच्या फोटोमध्ये जे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करताना दाखवले गेले होते ते मुळातच शिवसैनिक होते. मात्र शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांना पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे महत्व कमी करायचे असल्याने अशा प्रकारचे खोटे प्रवेश दाखवले जात आहेत. एकीकडे नेरूर विभागातील कविलकाटे व दुर्गाड मधील युवकांनी प्रवेश केला असे सांगायचे तर त्याच वेळेला शिवसेनेचे अन्य नेते प्रवेश केलेले ते कार्यकर्ते हे कुडाळ शहरातील मस्जिद मोहल्ला येथील असल्याचे भासवत आहेत. मुळातच जे कार्यकर्ते काल फोटोमध्ये दाखवले गेले आहेत ते शिवसेनेचे उपसरपंच समद मुजावर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच काम करत होते. मात्र शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना पक्षातील जुन्या लोकांचे महत्त्व कमी करावयाचे आहे. तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांनी गावात शिवसेना वाढवली नाही असे देखील वरिष्ठांना दाखवायचे आहे त्यामुळे अशा प्रकारचे खोटी प्रवेश सोहळे दाखवले जात आहेत. अशा खोट्या प्रवेशांना भारतीय जनता पार्टी भिक घालत नाही. नेरूर गावातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते हे अशा बरेच पक्ष फिरून आलेल्या स्वयंघोषित नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड प्रमाणात नाराज आहेत. लवकरच त्याचे परिणाम देखील शिवसेनेला भोगावे लागणार आहेत. मात्र केवळ वृत्तपत्रातून अशा प्रकारचे खोटे फोटो प्रसिद्ध करून स्वतःचीच पाठ स्वतः थोपाटण्याचे प्रकार या स्वयंघोषित नेत्यांनी बंद करावेत आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टी मधून जे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले त्यांची नावे जाहीर करावीत असे खुले आवाहन देखील पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांनी दिले आहे. नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, विनायक राणे, चारुदत्त देसाई व अन्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी नेरुर येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीचा विभागीय मेळावा पाहून कदाचित विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असल्यामुळे हे पक्षी प्रवेशाचू खोटे नाटक करणे भाग पडत आहे. जनता अशा लोकांच्या भूलथापांना कधीही बळी पडणार नाही असा विश्वास देखील श्री संदेश नाईक यांनी व्यक्त केला.