*कोकण Express*
*श्री. प. पू. भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवास प्रारंभ…!*
*साधेपणाने साजरा ; महाप्रसाद,सांस्कृतिक कार्यक्रम रद्द…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११७ वा जन्मोत्सव सोहळ्याला सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ करण्यात आला. बाबांच्या या उत्सवानिमित्त समाधीस्थळ फुलांनी तर परिसरात मंडप, विद्युतरोषणाईनी सजवण्यात आले आहे. तसेच आजपासून पुढील चार दिवसांच्या कालावधीत हा जन्मोत्सव साजरा होणार आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे.परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आणि जन्मोत्सव सोहळा दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जात होता. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कमिटीने पुण्यतिथी उत्सव जसा साजरा केला.त्याच पद्धतीने जन्मोत्सव सोहळा हि साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितले.
पहाटे समाधीपूजन, काकड आरतीपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थामध्ये भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. तद्नंतर भक्तांच्या कल्याणार्थ ‘परमहंस भालचंद्र मन्युसुक्त याग’ हा धार्मिक विधीला प्रख्यात ब्रह्मवृद व संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, सदस्य,भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थांचे पदाधिकारी दादा नार्वेकर, अशोक सापळे, विश्वस्त मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, अँड.प्रवीण पारकर, व्यवस्थापक विजय केळुस्कर, श्री.सापळे यांसह भाविकभक्त उपस्थित होते. यंदा महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ७ वा.धुपारती, रात्रौ ८ वा. बाबांची दैनंदिन आरती होणार आहे. तरी या कर्यक्रमाला कोविड १९ चे शासकीय नियम पाळून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.