*कोकण Express*
*प्रकल्पग्रस्त व प्रशासन यामधील चर्चा निष्प्रभ-*
*नवीन कुर्ली ग्रामस्थांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरुच-*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नवीन कुर्ली गावातील प्रकल्पग्रस्तांचे २६ जाने. पासुन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यासंदर्भात सुरु असलेले उपोषणास आज पाचव्या दिवशी सुरुच आहे. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाशी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी भेट देवुन पुन्हा- पुन्हा फक्त तोंडी आश्वासने देवुन प्रकल्पग्रस्तांची बोळवण करीत असुन गेल्या २० वर्षाचा इतिहास पाहता अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांचा या यंत्रणेवर कोणताच विश्वास राहिला नसल्याने जोपर्यत प्रकल्पग्रस्तांना कोणतेही लेखी ठोस आश्वासन देत नाहीत तो पर्यत प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरुच राहील अशी उपोषणकर्त्याकडुन भुमिका घेण्यात आली आहे.
प्रकल्पग्रस्तांना भीक नकोय तर न्याय हवायं.. आणि हा न्याय मागण्यासाठी लोकशाहीने दिलेल्या उपोषण सारख्या आयुधाचा वापर करुन प्रकल्पग्रस्त न्याय मागीत आहेत परंतु तीच- तीच चर्चा अन् तीच- तीच आश्वासाने देवुन प्रकल्पग्रस्तांची पुन्हा बोळवण होत असेल तर प्रकल्पग्रस्तांच्या संयमाचा आता कुणीही अंत पाहु नये. येत्या दोन दिवसामध्ये उपोषणकर्ते आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी प्रशासनाकडुन सकारात्मक चर्चा न झाल्यास यापुढे प्रकल्पग्रस्त अधिक आक्रमक होवुन उपोषणाची प्रसंगी आंदोलनाची पुढील भुमिका घेतील असा इशारा प्रकल्पग्रस्तांकडुन देण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यामध्ये नवीन कुर्ली येथे तात्काळ नवीन ग्रामपंचायत स्थापन करणे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यायी शेत जमिन देय असल्याने ती त्वरीत देण्यात यावी, तसेच पुर्नवसन गावठणातील प्रमुख १८ नागरी सुविधा तात्काळ पुर्ण करणे अशा प्रमुख मागण्या आहेत.