*कोंकण Express*
*अभ्यासातली सकारात्मकता जीवन समृद्ध बनवते! ; श्री रंजन चिके*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री रंजन चिके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोद पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या जीवना तीन वर्षाचा महाविद्यालयीन काळ हा मैलाचा दगड असतो. याच काळात आपला व्यक्तिमत्व विकास होतो. पुस्तकाच्या पलीकडेचे शिक्षण महाविद्यालयात मिळते. त्याच्या उपयोगा करण्यासाठीच सदिच्छा दिल्या जातात. त्यासाठीच आपण सर्व जमलो आहोत. असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचनंतर उपस्थितांची ओळख व स्वागत करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
दिपाली जाधव, खुषी कामतेकर, अमिषा चव्हाण, सुजय कोलते, रेवती मेस्त्री व संतोष सावंत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थी दशेत असताना मिळालेल्या संस्काराचा आलेख त्यांनी मांडला.
त्यानंतर आपल्या मनोगतात बोलताना प्र प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवन खूप छान जगले पाहिजे. ही सदिच्छा म्हणजे निरोप नाही. आपण माजी विद्यार्थी म्हणूनही महाविद्यालयाच्या संपर्कात राहू शकता. नॅक समिती आपल्या माध्यमातून महाविद्यालयाचे मूल्यमापन करणार आहे. त्यामुळे तुम्ही महाविद्यालयात पुन्हा येऊ शकता, येथे बागडू शकता आणि महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढवू शकता. सर्वच आजी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री रंजन चिके म्हणाले की, ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी महाविद्यालयाची सुरुवात केली. याची गोमटी फळे आपण आज चाखत आहोत. ग्रामीण भागातील गरीब तरुण-तरुणी शिकून मोठी झाली पाहिजेत. त्यांनी नोकरी, व्यवसाय केले पाहिजेत. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण व समृद्ध होतील. कौशल्य शिक्षण हे आजच्या जगाची मागणी आहे, त्यास अनुसरून काही गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आपला व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. स्पर्धेच्या युगात माझ्या फोंडाघाट मधला युवक मागे राहता कामा नये, यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तुम्ही घडा म्हणजे आम्हाला समाधान मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश राणे यांनी तर आभार डॉ. संतोष रायबोले यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

