*कोंकण Express*
*आजच्या समाजाने दिव्यांग व्यक्तींना स्वीकारणे महत्वाचे – सूर्यकांत वारंग*
*कणकवली पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय दिव्यांग मेळावा संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिव्यांग या समाजातील एक घटक आहेत. समाजाने दिव्यांग व्यक्तींना स्वीकारले पाहिजे. त्यांना सन्मान नाने आपलेसे केले पाहिजे. तर समाज सुधारू शकतो. तसेच दिव्यामग व्यक्तींकडे दिव्यांग म्हणून न पाहिल्यास त्यांना सक्षकम करण्यासाठी जर प्रयत्न केले तर दिव्यांग व्यक्ती अजून सक्षम होऊ शकतात. असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी केले. यावेळी ते भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे पंचायत समिती कणकवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय दिव्यांग मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी जगदीश कातकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसीलदार प्रिया हर्णे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सामान्य प्रशासन विभागाचे अनिल चव्हाण, पं. स. चे योजना कक्ष अधिकारी सी. डी. परब, मनीषा देसाई, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी श्री. शेळके, दक्षता मांजरी, भाऊसाहेब कापसे, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिव्यांग व्यक्तींना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दिव्यांग बांधवांना मतदान करता यावे यासाठी विविध सुविधांची पूर्तता केली आहे. त्यामध्ये ज्या दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येणार नाही. त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांना ४०% पेक्षा जास्त दिव्यांग आहेत, त्यांना बारा डी चा फॉर्म भरून घेऊन घरातून मतदान करता येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
पुढे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले, एकता दिव्यांग विकास संस्थेने भेट घेऊन दिव्यांग मेळाव्याची मागणी केली होती. त्यानुसार पंचायत समितीच्या सेस अंदाजपत्रकातील ५ टक्के दिव्यांग कल्याण अंतर्गत सामूहिक योजना अनुदानातून हा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांनी त्या योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्या दरम्यान विविध योजनांची माहिती दिव्यांग बांधवांना देण्यात येणार आहे त्या योजना समजून घेऊन त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले. तसेच पुढच्या वर्ष यापेक्षाही मोठा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
या मेळाव्यात दक्षता पांजरी यांनी दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिला बचत गटाप्रमाणेच दिव्यांग बांधवांचाही प्रत्येक गावामध्ये पाच – दहा जणांचा बचत गट तयार करण्यात येतो. त्यामध्ये दिव्यांग पुरुष व महिलांचाही समावेश होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. यावर दिव्यांग बांधवांनी ज्या गावामध्ये पाच दिव्यांग व्यक्ती नसतील तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी दक्षता पांजरी यांनी जिल्हास्तरावर यावरची माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले.
त्याचप्रमाणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत अवयव व साधनांची नाव नोंदणी करण्यात आली. भाऊसाहेब कापसे यांनी दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांचे मार्गदर्शन केले. या दिव्यांग मेळाव्याला तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.