*कोकण Express*
*मरेपर्यंत इतरांसाठी जगलेला महामानव म्हणजे नाथ पै:प्रदीप नेरुरकर*
“मरेपर्यंत इतरांसाठी जगलेले लोकोत्तर समाजसेवक राजकारणी नाथ पै होय.त्यांचे एक दोन विचार जरी जगलो तरी त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.त्यांसाठी स्वतःशी स्पर्धा- संघर्ष करा. आपली ओळख निर्माण करा . असे उद्गार प्रदीप नेरुरकर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित बॅ.नाथ पै यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “माणसातील माणसावर प्रेम करणारा, अनाथांचा नाथ म्हणजे नाथ होय. आपल्या विचारामुळे समोरच्या माणूस दुखावला जाणार नाही असा विचार करून आपलं आयुष्य जनसामान्यांसाठी जगलेला, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राजकारण करणारा आदर्शवत लोकप्रतिनिधी म्हणजे नाथ पै होय.”अशा शब्दात त्यांचा त्यांनी गौरव केला व सेवापेशा स्वीकारलेल्यांनी आपण सेवेसाठी जन्मलेले आहोत त्याचा आनंद घ्या. अशा प्रकारचा संदेश दिला व नाथ पै यांच्या आयुष्यातील काही दाखले श्रोत्यांसमोर सादर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली .
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, डॉ .व्यंकटेश भंडारी, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्रा.शरावती शेट्टी इत्यादी उपस्थित होते.
दीपप्रज्ज्वलन व व नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर व उपस्थितांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केल्यानंतर कार्यक्रम अध्यक्ष दादा मडकईकर यांनी “ज्यांची भाषण ऐकण्याचा योग आला अशा महामानवाच्या जयंती निमित्त आपणास बोलवले याबद्दल धन्यवाद देत बॅरिस्टर नाथ पै यांचे वक्तृत्व, कर्तृत्व त्यांचा लोकोत्तर कर्तृत्व याचे विविध किस्से उपस्थितांना सांगत आपल्या मातृभूमीबरोबर मातृभाषेवर प्रेम करण्याचाही त्यांनी उपस्थितांना सल्ला दिला व आपल्या जत्रा,जावय,पळस फुल्लो रानात अशा प्रसिद्ध मालवणी कविता उपस्थितीतांसमोर गाऊन सादर केल्या. व उपस्थितांची दाद मिळवली.
उमेश गाळवणकर यांनी नाथ पै सारख्या महान व्यक्तींचे संस्कार ज्या पिढीवर होतील ती पिढी नक्कीच चांगला देश घडवेल आणि हे आदर्श तरुणांसमोर ठेवण्यासाठी आपण थोर महात्म्यांच्या स्मृती दिन व जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्यांचा विचार यांचा विसर पडू न देता त्यांचा एक तरी आदर्श तरुण पिढीवर झाल्यास त्या महामानवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे सांगत त्यांना अभिवादन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी तर उपस्थितांचे आभार विभा वझे यांनी मानले.यावेळी विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.