*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केली मागणी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा तसेच नैसर्गिक आपत्ती अनुदान, प्रलंबित प्रोत्साहन अनुदान व खावटी कर्ज, कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना अद्याप विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. राज्य व केंद्र सरकारने विमा हप्ता न भरल्याने शेतकऱ्यांना सुमारे 120 कोटी रुपयांची मिळणारी भरपाई प्रलंबित राहिली आहे. याबाबतची पूर्तता शासनाने त्वरित केल्यास गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो. तरी त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी श्री. पारकर यांनी यावेळी केली. पळ पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी आश्वासन श्री मुंडे यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही ते अनुदान लवकरात लवकर मिळावे. तसेच शासनाच्या कर्जमाफी योजनेतून काही शेतकरी आजही वंचित आहेत. खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. तर नियमित कर्ज भरणारे अनेक शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. याबाबतही कार्यवाही करण्याची मागणी श्री पारकर यांनी केली.
तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मंडळ स्तरावर आवश्यकतेनुसार हवामान व पर्जन्यमापक केंद्र स्थापन करण्यात यावीत. तसेच गेल्या वर्षभरात सुपारी वरील कोळेरोगाने मोठ्या प्रमाणात बागायतदारांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात यावा अशी मागणी श्री पारकर यांनी यावेळी केली.