*कोकण Express*
*_विविध योजनातर्गत लाभ व पुरस्कार वितरण कार्यक्रम_*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौदर्यांबद्दल डिजिटल स्वरूपात माहिती द्यावी*
*-पालकमंत्री रविंद्र चव्हाण*
*सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.)*
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजे, जिल्ह्यात काय काय आहे हे सर्वांना माहिती करून देणे गरजेचे आहे. म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती डिजिटल स्वरूपात देण्याची गरज असल्याची माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
येथील शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे विविध योजनांतर्गत लाभ व पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, येणारा प्रत्येक पर्यटक हा आपला पाहुणा आहे. तो आपल्यासाठी वेगवेगळ्या संधी घेऊन येतोय याचा विचार येणाऱ्या काळात करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याचे पर्यटनाचे महत्व वाढवायचे असेल, पर्यटनाच्या दृष्ट्रीकोनातून जीडीपी वाढवायचा असेल तर आपल्याकडे काय चांगल आहे याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार येणाऱ्या काळात केला गेला पाहीजे. जिल्ह्यातील सौदर्यं, किनारा, येथील प्रत्येक व्यवस्था चांगल्या आहेत हे जोपर्यंत आपण लोकांना सांगणार नाहीत त्या गोष्टी राज्यात व राज्याबाहेर तसेच परदेशापर्यंत पोहोचणार नाहीत. असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यात भजन संस्कृती गेली अनेक वर्षे आपण पाहत आहोत. गणेश उत्सव, सण असो किंवा डबलबारी असो हे प्रत्येकासाठी खूप आवडीचे आहे. प्रत्येक गाव व वाडी हे भजनाचे विशेष आंनद घेत असतात. आज एक मदतीचा हात म्हणून प्रशासकीय माध्यमातून हा एक उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाध्ये सुमारे 3 हजार पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील या संस्कृतीला पाठबळ देण्याचं काम या निमित्ताने होत आहे. शासनाच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या निमिताने आनंदाचा शिधा हा आपल्यापर्यंत पोहाचविले जातील.
श्री. चव्हाण म्हणाले, सरकारी यंत्रणा किंवा लोकशाहीला बळकट कसे करता येईल व राजकारणाच्या पलीकडे शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास व विकासाच्या असणाऱ्या व्यवस्था पोहोचविल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे 14 व्या वित्त आयोगातील निधीमुळे ग्रामीण भागात विकासाची गंगा सहजपणे पोहचत आहे. गावातील सर्व नागरिकांना गावाचा विकास करता आला पाहिजे. प्रत्येक गावातील व शहरातील प्रत्येक घराला जल जीवन मिशन योजनांतर्गत स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. जल जीवन मिशन च्या माध्यमातून प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळालं तर पोटाचे विकार कमी होतील. म्हणून या मिशनची सुरुवात झाली आहे.
शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर म्हणाले, प्रत्येक घरामध्ये शुध्द पाणी मिळाला पाहीजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन योजना संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात आली आहे. त्याची अमंलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे याचा मला आनंद आहे. गावा गावांना 12 महिनेही शुध्द पाणी मिळायला पाहिजे. तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर कसा करावा व तो लोकहिताच्या दृष्टीने कसा करावा, हे सुध्दा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकण्या सारखे आहे. स्किल डेव्हलपमेंट मोठी चळवळ संपूर्ण भागरतामध्ये सुरु झाली आहे. आज जगामध्ये भारतीय मुलांना खूप मागणी आहे. इंजिनियरींगचे शिक्षण मराठी भाषेमध्ये सुरु झाले आहे. शासनाची विविध योजना या लोकापर्यंत पोहोचली पाहिजे. असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यात भजन ही आपली परंपरा आहे. या भजन भंडळाची गरज ओळखून आज जिल्हा परिषदेमार्फत त्यांना भजनासाठी लागणारे साहित्य वितरण केले. यावर्षा नेव्ही डे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणार आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत विभागामार्फत भजन मंडळाना भजन साहित्य वितरण, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर पुरस्कार वितरण, अमृत महा आवास अभियान पुरस्कार वितरण, जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नळ घोषित झालेल्या 172 गावांचे सादरीकरण, आदर्श ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक पुरस्कार वितरण, जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण यावेळी मानय्वरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचेचे अधिकारी-कर्मचारी, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

