*कोकण Express*
*प्रज्ञांगण संस्थेने प्रशासकीय अधिकारी व प्रसार माध्यमकर्मींना राखी ऐवजी बांधले कृतज्ञता बंध*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे ( प्रज्ञांगण संस्था ) अंतर्गत कृतज्ञता बंध म्हणून रक्षाबंधन हा दिवस दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गेली अकरा वर्षांपासून या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे कृतज्ञता रक्षा बंध आहे. जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग, येथे आज सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच प्रसार माध्यम म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तींना व कर्मचाऱ्यांना कृतज्ञता पर रक्षाबंधनाच्या राख्या बांधल्या जातात. समाजात तंबाखू व्यसनाचे प्रमाण कमी होण्यासाठी असणाऱ्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी तर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे म्हणून प्रसार माध्यमांसाठी अशी अनोखी व्याख्या जोपासत आपल्या समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना राख्या बांधून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे, प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर तळेरे च्या अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
सोबतच विद्यार्थ्यांमध्ये रोजगार निर्मितीची जाणीव व्हावी यासाठी श्रावणी कंप्युटर च्या विद्यार्थ्यांनी विशेष नारळाच्या करवंट्या पासून इको फ्रेंडली बनविलेल्या या राख्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना बांधण्यात आल्या.
याप्रसंगी श्रावणी कंप्युटर चे संचालक श्री. सतीश मदभावे, प्रज्ञांगण संस्थेच्या संस्थापिका सौ. श्रावणी मदभावे यांनी विद्यार्थ्यांसोबत ओरोस येथील जिल्हा मुख्य कार्यालय येथे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मा. श्री किशोर तावडे, उपजिल्हाधिकारी मा. श्री. रवींद्र मठपती. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथ. मा. श्री. धोत्रे,उपशिक्षणाधिकारी प्राथ. मा. श्री. शोभराज शेर्लेकर , जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग. मा. श्री. सोमनाथ ज्ञानदेव रसाळ, तसेच युवकांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या मा. श्रीमती. अपेक्षा मांजरेकर नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग. जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग. मा. श्रीम.विद्या शिरस. आणि कर्मचारी यांना राखी बांधून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्त विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांसमोर तंबाखू व्यसनमुक्ती वर आधारित कविता सादर करून या उपक्रमामध्ये सामील होण्याची विनंती केली. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी कु. रोशन कांबळे, कु. रोशनी बागवे, कु. सुकन्या जठार, कु. हर्षदा तळेकर, कु. तेजल सावंत आणि कु. जयश्री तायशेटे यांना अधिकाऱ्यांनी शाबासकीची थाप देत त्यांच्या या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या.