*कोकण Express*
*न भुतो न भविष्यती*
*वय ६५… पैकी ४४ वर्षें जनसेवा… पोस्टमन…चंद्रही गाठला असता… गजाभाऊचा ह्रद्र सत्कार*
*गावकरी नि सहकार्यांची अलोट मांदियाळी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज काल प्रत्येक क्षेत्रात बहुतेक प्रामाणिकपणा, माणुसकी, विश्वासाहर्ता आदी लोप पावत चालली आहे. या परिस्थितीत एकादी व्यक्ती अशा गुणांच्या जिवावर समाज प्रिय होत असेल तर नक्कीच ती अमोल सत्काराला पात्र ठरते. असाच एक ह्रद्र सत्कार मालवण तालुक्यातील नांदरुख – आंबडोस गावांत संयुक्तरित्या अनुभवास आला. वयाची ६५ सावी पुर्ण करीत असताना तब्बल ४४ वर्षें दिवसाला सरासरी १५ कि. मी. पायी चालत गावकर्यांच्या
सुख – दु:खात सहभागी होऊन पोस्टमन म्हणून काम करणारे नांदरुख गावचे गावकरी गजानन विश्वनाथ चव्हाण तथा गजाभाऊ यांच्या अशा कर्तुत्ववामुळे आयोजित त्यांच्या सत्काराने अलोट गावकर्यांनी अनुभवला. न भुतो न भविष्यती अशा ह्रद्र सत्कारामुळे उपस्थितही भारावून गेले होते.
ग्राम सेवा संघ, नांदरुखचे अध्यक्ष, माजी सरपंच दिनेश गजानन चव्हाण, सचिव समीर शशिकांत पाटकर आणि सहकार्यांनी मिळून गजानन विश्वनाथ चव्हाण यांच्या ४४ वर्षांच्या पोस्टमन पदाच्या निवृती आणि ६५ व्या वाढदिवसाच्या सत्काराच्या निमित्ताने दुग्धशर्करा योग घडवून आणला. नांदरुख गावातील पुर्ण प्राथमिक शाळा, नांदरुख-आंबडोसच्या सभागृहात हा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आंबडोस गावचे माजी सरपंच, प्रमुख मानकरी दिलीप परब होते. व्यासपीठावर गजानन चव्हाण, पत्नी सौ. गजश्री चव्हाण, नांदरुख, चौके गावांचे सरपंच रामचंद्र चव्हाण, गोपाळ चौकेकर,नांदरुखच्या माजी सरपंच समृद्धी चव्हाण, स्मिता पाटकर, आंबडोसच्या माजी सरपंच राधा वरवडेकर, तसेच रमेश चव्हाण, विलास चव्हाण, सुनील चव्हाण, नांदरुखचे सुपूत्र , ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण होते.
अध्यक्षपदावरून बोलताना दिलीप परब यांनी गजाभाऊ हे गेली तब्बल ४४ वर्षें उन पावसाची तमा न बाळगता पायीवारी करत दिवसाला दोन्ही गावांत सरासरी १५ कि. मी. चे अंतर तुडवत होते. त्यांनी गाववाल्यांशी जवळकीचे भावनिक नाते जोडले. आजची भरगच्च उपस्थिती ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. या कालावधीतही कोणाच्याही स्थावर मालमत्तेच्या व्यवाहारात गाववाल्यांची फसवणूक होऊ नये याची ते दक्षता घेत असत असे सांगून ते म्हणाले, गजाभाऊनी आता उभयतांच्या राहून गेलेल्या आवडीच्या छंदांना वेळ द्यावा. विविध क्षेत्रात कार्यमग्न राहून आम्हालाही मार्गदर्शन करावे.
दिनेश चव्हाण यांनी भारतीय डाक विभागातील काही भागांत अनेक प्रकारचे गैरव्यवहार होतात. पण गजाभाऊसारखे पोस्टमन अपवाद असतात. मनीऑर्डर संस्कृतीत गणेशोत्सव काळात कोणा भगिंनींची मनीऑर्डर पोचायला उशीर झाला तर त्यांनी पदरचे पैसे देऊन गजानन हे नाव सार्थ केले आहे. त्यामुळे गजाभाऊ हे आमच्या गावचे खर्या अर्थाने भूषण आहेत.
शाळकरी सोबती भाई चव्हाण यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी उड्डाणाचा संदर्भ देऊन गजाभाऊनी गेल्या ४४ वर्षांतील दरमजल पायीवारी मोजली तर ते एव्हाना ते चंद्रावर नक्कीच पोचले असते असे कौतुक करुन *नि. डा. हा. अं.* च्या मनीऑर्डर जमान्यापासून ते आताच्या डिटीजल युगापर्यंत स्वत:मध्ये परिस्थितीनुसार बदल करत त्यांनी ४४ वर्षें कार्यरत राहण्याची किमया केली. गजाभाऊसारखेच निखालस चारित्र्यांच्या व्यक्ती करु शकतात.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह चौके डाक कार्यालयाच्या प्रमुख सौ. चिपकर, सहकारी भुषना तावडे, नांदरुख, आंबडोस, रेवंडी, वायरी, साळेल, माळगाव, काळसे, बांदिवडे, कुंभारमाठ, वायरी , आंबेरी, धामापूर आदी गावांतील पोस्टमन, चौके व्यापारी संघाचे अध्यक्ष रघुनंदन राणे आदींनी सत्कारमुर्तीला आपल्या भाषणांतून शुभेच्छा दिल्यात. सूत्रसंचालन ग्रा. पं. सदस्य संगम चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री प्रशांत नाईक, विशाल धुरी, सुरेश राणे, सुहास राणे, अभय परब, भरत तोंडवळकर, विकास चव्हाण, नितिन चव्हाण, घनश्याम परब, प्रसाद लाड, समीर लाड, सतीश कांबळी, संदीप कांबळी, दिपेश नामनाईक आदींनी परिश्रम घेतले. शाळकरी मुलेही मोठ्या संख्येने उपस्थित होती.