*कोकण Express*
*तोंडवली सरवणकर वाडीच्या रस्त्याची चाळण तर नदी काठाची भयंकर धूप,ग्रामस्थ हवालदील*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील तोंडवली सरवणकरवाडी येथील ग्रामस्थ अनेक समस्यांमध्ये आहेत. सरवणकरवाडी लगतची जमीन नदीमुळे वाहून चालली आहे. या वाडिकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
तोंडवली सरवणकरवाडी तशी पहायला गेल्यास एका बाजूस पडते. या वाडीत सुमारे 16 घरे आहेत. साधारण महामार्गापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या वाडीत जायचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. अध्येमध्ये रस्त्याचे काम केल्याचे दिसते. अन्यथा पूर्णपणे रस्ता बाद झाला आहे.
रात्री अपरात्री काही झाल्यास या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे होऊन जाते. पुढे गणेशोत्सव येत आहे, त्यादृष्टीने या वाडीत सुविधा असणे आवश्यक आहेत. त्यांचीही वानवा जाणवते.
तर सरवणकरवाडीतील ग्रामस्थांची भातशेती असलेली जमीन अक्षरश: वाहून जात आहे. पियाळी नदीच्या पाण्याने नदी लगत असलेली जमिनीची धूप होत आहे. सध्या सुमारे 10 ते 15 फूट जमीन वाहून गेलेली दिसून येते. त्यामुळे भातशेतीही करणे धोक्याचे बनले आहे. तिथे शेतकरी अक्षरश: त्या परिसरात जीव धोक्यात घालून शेती करतात.
पावसाळ्यात भातशेती करताना या नदीलागतची जमीन कधी खचून अनर्थ घडेल याबाबत काहीही सांगू शकत नाही. यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ नये यासाठी या नदी लगत संरक्षक भिंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे.