*कोकण Express*
*शिकाल तर टिकाल – युवा उद्योजक संजय चव्हाण*
*कणकवली तालुका चर्मकार समाजच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अखंड सातत्य ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपल्या समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप ही त्या विद्यार्थ्यांला भविष्यात प्रेरणा देणारी असते.समाजबांधव म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी यथाशक्ती सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. शिकलो तरच या जगात आपण टिकलो हा मंत्र लक्षात ठेवून यश मिळवण्यासाठी नेहमी झटत राहा. उद्योजक नंतर आधी मी चर्मकार समाजबांधव आहे.समाजाप्रती माझे दायित्व पार पाडणे हे महत्वाचे आहे.याहीपुढे समाज उन्नतीसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील असे प्रतिपादन शिरवल गावचे सुपुत्र मुंबई येथील युवा उद्योजक संजय चव्हाण यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कणकवली कनकनगर येथील शिवशक्ती मंगल कार्यालयात संपन्न झाला त्यावेळी चव्हाण बोलत होते.यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक संजय चव्हाण, समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे , तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, ऍड अनिल निरवडेकर, उदय शिरोडकर, तालुका सचिव अविनाश चव्हाण, एसटी को ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर प्रवीण म्हापणकर, केशव पावसकर, शरद जाधव, चंदू भोसले, सत्यविजय जाधव, आनंद जाधव, सुंदर जाधव, संजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण, महेंद्र चव्हाण,मंगेश साळसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन उद्योजक संजय चव्हाण यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून .आणि मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण करण्यात आले. शालेय ,माध्यमिक,उच्च माध्यमिक, पदवी पदव्युत्तर तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुजित जाधव म्हणाले की, जिल्ह्याचे संत रविदास समाज भवन दृष्टीक्षेपात असून दिमाखदार 3 मजली इमारत उभारली जात आहे. यासाठी 80 लाखांचा भरीव निधी आणण्यासाठी जिल्हा संघटना मेहनत घेत आहे.या समाज भवनात स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करणार आहोत. समाज संघटनेच्या माध्यमातून 5 वि आणि 8 वि मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित केली जाणार आहेत. जिल्ह्यात चर्मकार समाजाच्या विविध संघटना असल्या तरीही संत रविदास जयंती गतवर्षीप्रमाणे चर्मकार समाज या झेंड्याखाली सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे. कणकवली तालुक्यातील कणकवली शहरातील समाजभवन उभारणीचे स्वप्न लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेत असल्याचे जाधव म्हणाले. तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण म्हणाले की, यश संपादन करून आईवडिलांचे नाव उज्वल केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार केला असला तरी या यशात त्यांच्या आईवडिलांचा सिंहाचा वाटा आहे. आज यशवंत विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश मिळवून आईवडिलांचे नाव उज्वल केले आहे.भविष्यात कठोर मेहनत घेऊन परीक्षाना सामोरे जा.आत्मविश्वासाने स्पर्धेला तोंड द्या यश तुमचेच आहे. कष्ट केल्याशिवाय यश कधीच मिळणार नाही. विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम हे एक निमित्त आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्रित येतो, विचारांची देवाणघेवाण होते हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले करिअर निर्माण करताना जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपल्या समाजाकडे वळून बघा.ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात द्या. जिल्ह्याचे नियोजित संत रविदास समाजभवन निर्मिती च्या कार्यात सर्व समाजबांधवांनी यथाशक्ती आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन महानंदा चव्हाण यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले की, विजय चव्हाण समाज संघटित झाला तरी आपण प्रगती करतोय काय ? याचे सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. कणकवली तालुका चर्मकार समाज संघटना या पातळीवर नेहमीच उजवी ठरली आहे.कणकवली तालुक्यातील चर्मकार समाजातील युवा पिढी हिरीरीने समाजकार्यात सहभागी होत आहेत ही जमेची बाजू आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाकडे राजकीय सत्ता स्थाने असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 8 सरपंच चर्मकार समाजाचे आहेत. जिल्ह्यात होऊ घातलेल्या जि प निवडणुकीत 2 तर पं स निवडणूकीत 4 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्या जागांवर चर्मकार समाजाचे लोकप्रतिनिधी असावेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक सत्यविजय जाधव यांनी, सूत्रसंचालन अविनाश चव्हाण यांनी केले.आभार शंकर चव्हाण यांनी मानले.