*कोकण Express*
*प्रा. हरी नरके,फुले – आंबेडकर विचारांचा धगधगता अंगार काळाच्या पडद्याआड*
*संजय भोसले _ संकलीत लेख*
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर विपुल लेखन करणारे ज्येष्ठ लेखक, विचारवंत, आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष, उत्कृष्ट वक्ता ,मार्गदर्शक, संशोधक ,शिक्षक ,साहित्यिक, शिव, फुले, सयाजी, शाहू, आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सामाजिक शैक्षणिक वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृतिशील उपक्रम राबवणारे, भारतातील सर्वच बहुजन समाजातील चळवळीतील ऐक निर्माण व्हावे व टिकावे यासाठी प्रयत्नशील असणारे, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष, प्राध्यापक हरिभाऊ नरके यांचे एशियन हार्ट रुग्णालयात नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून एक धगधगता विचारवंत तारा पडद्याआड लोपल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
*हरी रामचंद्र नरके* यांचा कार्यकाल
( 01 जून 1963 ते 09 ऑगस्ट 2023)
मराठी लेखक ,अभ्यास, संशोधक वक्ते आणि मराठी ब्लॉगर असे लिखाण त्यांचे होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती ,भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारींची तपासणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये सामाजिक आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवरती उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगु याप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे. हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्राध्यापक हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
प्राध्यापक हरी नरके यांनी विपुल असे लेखनही केले आहे.” महात्मा फुले शोधांच्या नव्या वाटा “हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे फेब्रुवारी 2011 पासून ते ऑगस्ट 2023 पर्यंत त्यांनी ब्लॉग लिहिले आहेत. फेसबुकवरही ते लिखाण करत असत. प्राध्यापक हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता .हे लेख काही वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाले आहेत .मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती प्राध्यापक हरी नरके यांचा ‘अनिता पाटील’ यांच्याशी ब्लॉग वरून वादविवाद ही झाला होता. मराठा आणि कुणबी एकच आहेत की दोन या मुद्द्यावर प्रामुख्याने तो वाद होता .हरी नरके यांनी ‘फुले -आंबेडकर कोश ‘ लिहिला आहे. याशिवाय विविध नियतकालिका मधून त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखांचे विषय असे होते १)अण्णा हजारे आणि आपण,२) अभिजात मराठी ३),आरक्षण चित्रपट ४)आरक्षण विषयक ५)ओबीसी जनगणना ६)ओबीसी मध्ये पेरली दुहीची बीजे ७)घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ ८)चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक ९)फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन १०)मराठा आरक्षण ११)मराठी अभिजात कशी १२) महात्मा फुले १३) महाराजा यशवंत होळकर चरित्राचे प्रकाशन १४)माझे विश्व १५)शिक्षण १६)संभाजी ब्रिगेड १७)समाजशोध इ.
त्यांची काही पुस्तके ही प्रसिद्ध आहेत यामध्ये” महात्मा Blvd यांची बदनामी” : एक सत्यशोधन, आणि दुसरे “महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा”
प्राध्यापक हरी नरके यांनी त्यांच्या कारकीर्दीत तब्बल 56 पुस्तकांचे लेखन संपादन केले. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पेशाने ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून महात्मा फुले अध्यासन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे कार्यरत होते. निवृत्तीनंतरही ते सामाजिक वैचारिक चळवळीचे काम करतच होते. सोशल मीडियावरतीही ते अॅक्टिव्ह असायचे हे त्यांच्या ब्लाॅगवरून लक्षात येते. अनेक विषयावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता, ओबीसी समाजाच्या प्रश्नावरून आणि समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं.
*त्यांच्या बाबतीत घडलेल्या कांही महत्वाच्या घटना*- सन 1987- 1988 च्या सुमारास तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांची बदनामी आरएसएस चे कार्यकर्ते डॉक्टर बाळ गंगाधर यांनी केली. ते म्हणजे “ही कसली फुले, ही तर दुर्गंधी “.अशा प्रकारचा अपमान जनक लेख वृत्तपत्रात छापला होता. त्याकाळी फुले अनुयायी प्राध्यापक हरी नरके हे केवळ 28 वर्षाचे असताना अशा प्रकारे फुलेंच्या बदनामीकारक लेख त्यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी यावर संशोधन पर “महात्मा फुलेंची बदनामी : एक सत्यशोधन “हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं. तसेच महात्मा फुले यांचे साहित्य संपादन करणारे, ज्ञानज्योती सावित्रीबाई या अभ्यासपूर्ण पुस्तकाचेही लेखन त्यांनी केले . त्याचबरोबर “सनातनी ब्राह्मण और पुरोगामी ब्राह्मण -एक अंग की दो भुजाए” या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखाचे अभ्यासपूर्ण विश्लेषणही त्यानी केले होते.
*प्रा. हरी नरके यांच्या जीवनाला कलाटनी देणारा प्रसंग*-समीर गायकवाड व शैलजा मोळक यांच्या लेखा वरून
हरी नरके सर ज्या झोपडपट्टीत राहत होते तिथे शिक्षणाची परंपरा नव्हती .त्यांच्या घरातले शिक्षण घेणारे ते पहिलेच होते .शांताबाई कांबळे ही त्यांच्या आईची एक मांनलेली बहीण, ते तिला शांता मावशी म्हणत. ती सतत नरकेसरांच्या आईला सांगायची की पोराला शाळेत घाल. त्याकडे त्यांची आई दुर्लक्ष करत असे. मात्र एके दिवशी आई वैतागली, एकदा तिने मोठ्या मुलाला म्हणजे नरकेच्या मोठ्या भावाला सांगितलं की त्या शांताबाई चा एक नातेवाईक आहे कुणीतरी “बाबासाहेब आंबेडकर” तो सारखं म्हणत असतो की पोरांना शाळेत घाला. त्यामुळे त्या शांताबाईने माझ डोकं खाल्लय. उद्या हरीला घेऊन तू शाळेत जा. मोठा भाऊ आणि किशोरवयीन हरी नरके शाळेत गेले, मुख्याध्यापकांना भेटले, मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष संपलं असल्याची माहिती दिली. आता तुम्ही शाळेत कस आणता? असा सवालही केला. त्यावर नरकेंचा भाऊ उत्तरला आम्ही म्हणूनच याला शाळेत घालत नव्हतो काल पाडवा झाला आता नव वर्ष सुरू झालं आणि तुम्ही म्हणताय वर्ष संपलं? शिकला तो हुकला असंच आहे. भावाच्या या वाक्यानंतर मुख्याध्यापकांनी अर्ध्यातच थांबवलं ,स्वतःच कागद घेतला आणि अर्ज लिहिला .आणि नरकेंच्या मोठ्या भावाला सांगितलं की, एक जूनला याला शाळेत घेऊन ये. त्यानंतर हरी नरके शाळेत गेले .बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रेरणा निर्माण केली नसती तर आपण शिकू शकलो नसतो हेही हरी नरकेंच्या लक्षात आले. त्यांच्या आईला शांता मावशींनी प्रेरित केलं. त्यामुळे ते शाळेत जाऊ शकले. त्यांचे शिक्षक कांबळे सरांच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तो त्यांना खूप आवडलेला. त्यांनी सरांकडे तो फोटो मागितला आणि त्यांच्या घरात लावला. परिणामी त्यांच्या घरात जनप्रचंड भूकंप झाला. कारण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांच्या घरात लावला होता. म्हणून त्यांच्या मामाने त्यांना(हरि नरके यांना) रक्त येईपर्यंत मारलं होतं. ज्या बाबासाहेब आंबेडकरामुळे आपल्याला आईने शाळेत घातलं त्यांचा फोटो आपल्या घरात चालत नाही हे त्यांना माहीत नव्हतं .कारण तो काळ नामांतर चळवळीचा होता आंबेडकरांचे लेखन वाचताना हरी नरकेंचे अन्य चौफेर वाचन ही जारी होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या” रिडल्स इन हिंदू इझम “या ग्रंथावर बंदी घातल्याच्या विरोधातील लढ्यात प्रतिगामी सैन्यास धूळ चारल्या. त्याच दरम्यान माळी समाजासह अवघा ओबीसी समूह’ रथयात्रा ते राम मंदिर’ या हिंदुत्वाच्या लढाईत धर्मांध सैन्य, म्हणून लढत असताना एक ओबीसी युवक ज्योतिबानी फिरवलेले क्रांतीचे चक्र ,केलेली क्रांती -परिवर्तन जगाला सांगू लागला होता. त्या युवकाचं नाव होतं हरी नरके. हरी नरकेंच्या या कामाची दखल शरद पवार ,टाटा ,यांनी घेऊन पुण्याच्या टेल्को मध्ये नोकरी देऊन त्यांना अभ्यासाची दालने खुली करून दिली होती. ओबीसींची ब्राह्मणी गुलामी नष्ट करून त्यांना प्रगतीचे पंख बहाल करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद करूनही ब्राह्मणी जात्यांभिमानापोटी तत्कालीन ओबीसींनी आरक्षणास विरोध केल्यामुळे ,ओबीसी मागास असूनही त्यांनी विरोध केल्याने या आरक्षणापासून वंचितच राहिले होते. पुढे ओबीसींच्या आरक्षणासाठी संविधानात्मक तरतुदीनुसार मंडल आयोगाने केलेला अहवाल ही बासनात गुंडाळून ठेवला होता. तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी हा मंडल आयोग लागू केल्यामुळे भाजपाने व्ही पी सिंहाचे सरकार पाडले होते. या काळात ब्राह्मणी सैन्य झालेल्या माळी -ओबीसी पर्यंत ज्योतिबांचे क्रांतिकार्य पोचवून त्यांना फुले शाहू आंबेडकरी विचाराकडे वळवण्यासाठी जे लोक झपाटून लढत होते त्यामध्ये हरी नरकेंना टाळता येत नाही. महात्मा फुले समग्र साहित्य जमा करण्यासाठी शासकीय समितीचे सचिव म्हणून त्यांच्या कामाचे मूल्य कुणालाही करता येत नाही .नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवर ही नरके यांचे योगदान खूपच मोठे आहे .त्या काळात वसंत मुन, गौतम शिंदे, हरी नरके अमिताभ, एस एस मोरे, वैभव काळखैर, राजा गायंगी, आदी अनेक मित्रांच्या मैफिली आमदार निवास कॅन्टीन, मनोविकास प्रकाशनचा बुक स्टॉल ,येथे जमायच्या .अनेक वादग्रस्त विषयावर चर्चा झडायच्या या वादविवादातून साऱ्यांचाच बुद्ध, फुले, आंबेडकर जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत होत्या. त्या वैचारिक समृद्धीतूनच हरी नरकेने पुढे तथागतांच्या धम्मपथावर वाटचाल करण्यास सुरुवात केली होती. या देशाला बुद्ध फुले आंबेडकरी विचारांच्या धम्मपथानेच मुक्तीची दिशा भेटू शकेल. हा देश शोषणमुक्त समाज होऊ शकेल. याबाबत हरी नरकेंना फार मोठा विश्वास होता. आज वयाच्या अवघ्या साठाव्या वर्षी हरि नरकेंनी निरोप घेतलाय, अवघ्या ओबीसीसह साऱ्या उपेक्षित वंचित समाज प्रतिक्रांतीच्या चक्रव्यातून बाहेर पडून एकजुटीने बुद्ध -फुले, आंबेडकर मुक्ती ज्ञानपथाकडे वळणे, त्यांच्या जातीचा विध्वंस होणे ,डॉक्टर हरी नरकेंना यापेक्षा वेगळी आदरांजली कोणती ठरू शकेल बरं.अशा या संयमी,बुद्धिवादी विचारवंताला अखेरचा जय क्रांती,जय भिम.