*कोकण Express*
*नुकसानग्रस्तांना शासन निर्णयानुसार १० हजार रु.ची तातडीची मदत मिळवून द्या – आ. वैभव नाईक*
*कुडाळ तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा*
कुडाळ तालुक्यातील वालावल, चेंदवन, कवटी, नेरूर गावातील डोंगर कोसळून धोका निर्माण झालेल्या लोकांना तसेच अतिवृष्टीने नुकसान झाले आहे अशा सर्व लोकांना शासन निर्णयानुसार १० हजार रु. ची तातडीची मदत मिळवून देण्यात यावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरहानी झाली आहे त्या सर्व ठिकाणी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आलेल्या 7 प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी. अशा सूचना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कुडाळ तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तहसील कार्यालय येथे तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. सरंबळ, वालावल, चेंदवन, कवटी, नेरूर या गावातील पावसामुळे बाधित क्षेत्राचा व एकूणच कुडाळ तालुक्याचा त्यांनी आढावा घेतला.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा देखील आढावा घेण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे,कृष्णा धुरी, रुपेश पावसकर, राजू कविटकर, संतोष शिरसाट, राजू गवंडे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी श्रीम. ए. एस. घाटकर, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर,आरोग्य विभागाचे एम. डी. तेली, पोलीस श्री. सारंग, आर.टी.ओ.चे प्रितम पवार, कृषी सुपरवायझर आर. एस. चव्हाण आदी उपस्थित होते.