*कोकण Express*
*प्रबोधनानेच लोकसंख्येची जागृती होईल*
*डॉ.आर. बी. पाटील*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजाराम पाटील बोलत होते. लोकसंख्या विषय हा गहन आहे. त्याविषयी प्रबोधन हेच एक साधन आहे की लोकसंख्येविषयी जनजागृती करू शकते. लोकसंख्येच्या वाढीची कारणे व त्याचे परिणाम जनजागृतीनेच होते. आत्ताच्या लोकसंख्येचा जागतिक पातळीवर आढावा घेतला तर याच वर्षीच्या मध्यकालावधीत भारत देशाने चीनला मागे टाकले आणि जगात प्रथम क्रमांकावर प्रथम मिळवला. या वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील शहरे फार मोठ्या प्रमाणात विस्तारत आहेत. एवढ्या लोकसंख्येचे नियोजन हे आवाक्या बाहेर आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे समशीतोष्न कटिबंधातील देशात मोठे आहे. सोळाव्या शतकापासून विचार केला तर २०० वर्षांनी लोकसंख्या दुप्पट व्हायची परंतु आता ५० वर्षात दुप्पट व्हायला लागली. ११ जुलै १९८७ सालापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. कारण लोकसंख्या वाढीचा फटका सगळ्या जगालाच बसत आहे. पर्यावरण समस्या लोकसंख्येमुळेच होतात .त्यामुळे लोकसंख्या मर्यादित ठेवण्यातच आपल्या सर्वांचा विकास आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की लोकसंख्या नियंत्रणासाठी तरुणांचे प्रबोधन आवश्यक आहे. जगाची लोकसंख्या वाढते ही काही भूषानावह बाब नाही. भारताचा प्रथम क्रमांक हे पण भूषण नाही. लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी प्रत्येक माणसाने साथ दिली पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास हा लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे. वाढलेली प्रदूषणे हेही लोकसंख्या वाढीचाच परिणाम आहे. तो नियंत्रणात ठेवणे हे तरुणांच्या हातात आहे. असे प्रतिपादन केले.
या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग, भूगोल विभाग, व एनएसएस विभाग यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रा. कीर्ती पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.