*कोकण Express*
*ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा*
*राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा हाच आपला मुख्य छत्रु आहे हे लक्षात घेऊन आपापसात असलेले किरकोळ मतभेद आता विसरून जा आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक अनंत पिळणकर यांनी केले आहे. तर नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचे स्वप्न आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले की, जिल्ह्यात 70 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. ही निवडणूक म्हणजे या पुढच्या सर्वच निवडणुकांची रंगीत तालीम आहे. असेही ते म्हणाले.
आपल्यात काही स्थानिक पातळीवरचे किरकोळ मतभेद असतील तर ते या निवडणुकीत बाजूला ठेवावेत. कारण आपसी मतभेदाचा फायदा घेऊन आपला मुख्य छत्रु असलेला भाजपा त्याचा फायदा उठवू शकतो हे लक्षात घ्या. आपसी मतभेदावर तोडगा काढता येऊ शकतो मात्र एकदा का आपल्या हातातून संधी गेली तर ही संधी पुन्हा येऊ शकत नाही हे महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी लक्षात घावे असेही पिळणकर म्हणाले.
राज्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. ग्रामीण पातळीवर हेच समीकरण जुळून आले तर राज्यात आणि गावात एकाच आघाडीची सत्ता असल्याने गावचा विकास झपाट्याने करणे शक्य आहे. हे देखील कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. मतदान करताना कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. भाजपाला राज्यात जशे सत्तेबाहेर ठेवण्यात या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यश मिळवले त्याच प्रमाणे या 70 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची परंपरा कायम राखुया असे आवाहन यावेळी अनंत पिळणकर यांनी केले आहे.
*नवीन कुर्ली ग्रामपंचायत लवकरच येणार अस्तित्वात*
कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली गावची ग्रामपंचायत लवकरात लवकर व्हावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा केला आहे. लवकरच ही ग्रामपंचायत प्रत्यक्ष अस्तित्वात येईल अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समोतीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिली.
गेली 8 वर्ष आम्ही या ग्रामपंचायतीचा पाठपुरावा करत आहोत. जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना या प्रस्थावाला गती मिळाली आहे. आता हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या ग्रामपंचायचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यासाठी मोठी मेहनत घेतली असल्याचेही यावेळी पिळणकर म्हणाले. या ग्रामपंचायतीच्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या त्यामुळे बऱ्याचवेळा हा प्रस्ताव मागे आला होता. मात्र आता परिपूर्ण प्रस्ताव सादर झाला आहे. ही ग्रामपंचायत अस्तित्वात येऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत मात्र त्यांच्या या मनसुब्याना कधीच यश येणार नाही असेही पिळणकर यावेळी म्हणाले.

