*कोकण Express*
*प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील “त्या” अपात्र केलेल्या लाभार्थ्यांची सायबर सेल व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी..*
*”ते” परप्रांतीय बांग्लादेशीच नागरिक असण्याची दाट शक्यता..!*
*मनसे शिष्टमंडळ घेणार जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांची भेट*
जिल्ह्यात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी यादीमध्ये काही आक्षेपार्ह लाभार्थी आढळल्याने जिल्हा प्रशासनाकडून ते अपात्र ठरवून चौकशी अहवालात परप्रांतीय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ते नुसते परमप्रांतीय नसून पश्चिम बंगाल मार्गे देशात घुसखोरी केलेले बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे. हा प्रकार नुसता डिगस गावा पुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातच अशा पद्धतीने आक्षेपार्ह लाभार्थी आढळलेले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरून सदरच्या लाभार्थ्यांबाबतची शहानिशा करून शासनास वर्षभरापूर्वीच कळविले असताना देखील त्यांची त्याच वेळी सखोल चौकशी का करण्यात आली नाही हा खरा सवाल आहे. वास्तविक त्याचवेळी परप्रांतीयांचे अर्ज वेबसाईटवर कोणत्या माध्यमातून सादर करण्यात आले,त्याचा आयपी ऍड्रेस का ट्रॅक करण्यात आलेला नाही, बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसताना देखील योजनेचा लाभ खात्यावर जमा कसा झाला,वेबसाईटवर लाभार्थ्यांचा पत्ता नमूद नसताना लाभार्थी पात्र कसा ठरवण्यात आला असे असंख्य प्रश्न उपस्थित राहत असून शासनाच्या कार्यपद्धतीवर व वेबसाईटच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहेत. “त्या” बोगस लाभार्थ्यांची पोलीस विभागाकडून सायबर सेल व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल चौकशी करावी अशी मनसेची मागणी आहे. जिल्ह्यात वाळू तस्करीसाठी आणलेल्या कामगारांनी अशा पद्धतीने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केले आहेत का हेही तपासण्याची गरज आहे. याशिवाय जिल्ह्यात इतरत्र देखील पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश अशा ठिकाणांहून आलेले परप्रांतीय व्यावसायिक व कामगारांच्या कागदपत्रांची कसून चौकशी करावी अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली असून मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.