*कोकण Express*
*वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम मार्गी लावा..*
*आमदार नितेश राणे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण रेल्वे मार्गावरील रखडलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून आमदार नितेश राणे
यानी लक्ष वेधले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम मार्गी लावा, अशी मागणी केली आहे.
वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्ग
प्रकल्प प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रस्तावित रेल्वे मार्ग केवळ वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणार नाही तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही थेट जोडेल. यामुळे या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेलच शिवाय लोकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधाही उपलब्ध होतील.
मात्र, या प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याची या भागातील जनता आतुरतेने वाट पाहत असून, काम पुन्हा सुरू होण्याची वेळ आली आहे. वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणान्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी कृपया कार्यवाही करावी, त्याचा फायदा या भागातील जनतेला तर होईलच शिवाय देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, असे नितेश राणेंनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.