*कोकण Express*
*संविधानामुळे भारताची एकात्मता अबाधित – बाबसाहेब नदाफ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य निर्माण व्हावे याकरिता राष्ट्र सेवा दलामार्फत जनजागृती केली जात आहे.संविधानामुळे भारताची एकात्मता अबाधित आहे. समाजात असलेली विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम राष्ट्र सेवा दल करीत आहे.मात्र देशात धार्मिकवाद रुजविण्यासाठी काही मंडळी काम करीत आहेत .त्यामुळे हा धार्मिकवाद समाजात निर्माण करणाऱ्यांना वेळीच वेसन घातली पाहिजे.असे मत राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केले.
अद्वैत फाऊंडेशन व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रमात मुलांसाठी पाच दिवसीय व्यक्तीमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराअंतर्गत बाबासाहेब नदाफ यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी अद्वैत फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार व राजन चव्हाण यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बाबासाहेब नदाफ म्हणाले,भारत देश हा धर्मावर नाही, तर संविधानावर चालतो. संविधानामुळे भारताची एकात्मता अबाधित आहे. समाजात असलेली विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम राष्ट्र सेवा दल करीत आहे. कोकण हा एकेकाळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता, त्यामुळे कोकणाबद्दल मनात विशेष आस्था असून कोकणातील नवी पिढी संस्कारक्षम बनली पाहिजे, याकरिता राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व शिबिरे आयोजित करीत असल्याचे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी सांगितले.
बाबासाहेब नदाफ म्हणाले, राष्ट्र सेवा दलाची स्थापना १९४२ साली झाली आहे. समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य निर्माण व्हावे याकरिता राष्ट्र सेवा दलामार्फत जनजागृती केली जात आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढीला चुकीची माहिती व चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. ही बाब देशासाठी घातक आहे. तसेच देशात धार्मिकवाद रुजविण्यासाठी काही मंडळी काम करीत आहेत, हा धार्मिकवाद समाजात रुजला तर देशात अराजकता माजेल. त्यामुळे हा धार्मिकवाद समाजात रूजू पाहणाऱ्यांना वेळीच वेसन घातली पाहिजे. अन्यथा धार्मिकवादाचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतील. तसेच राष्ट्र सेवा दल मनुवादीच्या विचारसरनीच्या विरोधात लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात सध्या भयाचे वातावरण आहे. केंद्रीय तपास यंत्रणाला दिल्लीश्वरांच्या मर्जीनुसार काम करीत आहेत. याविरोधात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ॲड. असीम ससोदे यांच्यासह अनेक मंडळी रस्त्यावर उतरली असून देशात पुन्हा निभर्याचे वातावरण करण्यासाठी समाजात जनजागृती करीत आहे, ही बाब चांगली असल्याचे मत त्यांनी व्यक्त करताना मनुवादाच्याविरोधात राष्ट्र सेवा दलाने लढा उभारला असून जोपर्यंत मनुवादीविचार समाजातून नष्ट होत नाही, तोपर्यंत लढा सुरु राहणार आहे. मग, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागणार असला तरी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते सदैव तयार आहेत, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत धार्मिक मुद्द्याला जनतेने साथ दिली नाही तर विकासाला साथ दिली असेही ते म्हणाले.