*कोकण Express “
*”विवेक म्हणजे वेचने”.जे जे चांगले ते आत्मसात करणे.— डाॅ. आ. ह. साळुंखे*
*कासार्डे; संजय भोसले*
प्राचीन भारतात दोन मतप्रवाह दिसून येतात. यातूनच आधुनिक भारताची जडणघडण झालेली आपणाला पाहायला मिळते. प्राचीन काळातील अनेक तत्त्ववेत्यांनी जे तत्त्वज्ञान सांगितले त्याला’ दर्शन ‘असे संबोधले जाते. यामध्ये “नास्तिक दर्शन ” म्हणजे “तत्त्वज्ञानाने” सर्व मानव जातीला प्रभावित करून टाकले. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत ,साहित्यिक, आणि इतिहासकार ,*डॉ. आ. ह. साळुंखे* यांनी केले. ते कणकवली येथील नगरपंचायत वाचनालयात शनिवारी दि. ४मार्च रोजी ५.३० वा “अखंड लोक मंच” आयोजित “अखंड व्याख्यानमाला ” पुष्प पहिले चे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांचा विषय होता *”विवेक वादाचा भारतीय वारसा”.*
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखंड लोक मंचाचे अध्यक्ष सदानंद मोडक यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. व व्याख्यानमालांचा उद्देश कथन केला. तर डॉक्टर साळुंखे यांनी व्याख्यानमाला सुरुवात करण्यापूर्वी, *भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे* वाचन केले.
आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, विवेक वादाची संकल्पना अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांनी स्पष्ट केली. *विवेक म्हणजे वेचणे*. जीवनात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करणे म्हणजे *वेचणे* होय. तर *”स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष”* अशी ही एक संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. *मोक्ष म्हणजे वेदा पासून सुटका*. की ज्या काळी वेदाने मानवाची सर्व अंगे व्यापून टाकली होती, वेद प्रमाणाला महत्त्व प्राप्त झाले होते, त्या काळात चार्वाक्य, कपिल,वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी नास्तिक तत्त्ववेत्त्याचा म्हणजे *विवेक वादाचा पाया घातला* आणि वेदांचे अवडंबर माजलेल्या व्यवस्थेला धक्का दिला.
नास्तिक तत्त्ववित्यांनी माणसाला स्वतःच्या जीवनाकडे सतत विवेक बुद्धीने पाहण्यास आणि प्रश्न विचारण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर प्रत्येक कालखंडात विवेक वादांनी खंडन आणि मंडन करून आपला विचार प्रवाह सतत वाहत ठेवला. यामध्ये मग नाथ संप्रदाय असो की बसवेश्वर महाराज असो, महानुभव श्री चक्रधर स्वामी यांनी सुद्धा चातुरवर्ण व्यवस्थेला विरोधच केला होता. यानंतर संत परंपरेने तर चातुरवर्ण्य व्यवस्थेचे कंबरडेच मोडले होते. यात संत नामदेव, संत चोखामेळा हे अग्रणी होते. संत ज्ञानेश्वरांनी तर वेद हे कृषण आहेत असे समजले होते *कृषण म्हणजे कंजूस* होय. कारण चातूरवर्ण्य व्यवस्थेत शुद्रांना काहीच स्थान नव्हते. तर संत तुकाराम म्हणतात की चमत्कार म्हणजे लोकांना भुलवण्याचे कपट कारस्थान आहे. *धर्म हा चमत्काराला प्राधान्य देतो*. गुरुनानक नंतर संत कबीर आणि आधुनिक भारताचे शिल्पकार समजले जाणारे फुले ,शाहू, आंबेडकर व बडोद्याचे सयाजी महाराज. एवढा मोठा आपल्याला विवेक वादाचा वारसा लाभला आहे.
विवेक वादामुळेच मानवी जीवन सुसह्य झाले असून हे दोन्हीही मतप्रवाह प्राचीन काळातील अधून मधून एकमेकावर कुरघोडी करताना पहावयास मिळतात .प्रत्येकाने मात्र आपल्या पंचेंद्रियांच्या सहाय्याने आणि सद्सद् विवेक बुद्धी जागृत ठेवूनच जीवनात वाटचाल करावी. योग्य काय आणि अयोग्य काय? हे ठरवावे. आणि त्यानुसारच मार्गक्रमण केलेले बरे.
अखंड व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प लवकरच घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. या व्याख्यानाला परिसरातील हजारोंच्या संख्येने श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती.