मालवणात ‘खिचडी’ आंदोलन

मालवणात ‘खिचडी’ आंदोलन

*कोकण Express*

*मालवणात ‘खिचडी’ आंदोलन*

*गॅस दरवाढ व महागाई विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व पदाधिकारी यांची राज्य व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी*

*मालवण ः प्रतिनिधी*

लाकडानी पेटवलेल्या शेगडी चुलीवर खिचडी शिजवत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गॅस दरवाढ व महागाई बाबत राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महागाईने सामान्य जनतेचे हाल झाले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेसमोर महागाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख संमेश परब, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, युवती सेना कुडाळ मालवण प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत, सेजल परब, नंदा सारंग, तृप्ती मयेकर, निनाक्षी मेतर, विद्या फर्नांडिस, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, अमोल वस्त, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, गौरव वेर्लेकर, दत्ता पोईपकर, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खोबरेकर म्हणाले, राज्यातील गद्दार सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी महागाई वाढवून जनतेचे हाल केले आहेत. २०१४ पासून गॅस सिलेंडरची किंमत तिप्पट वाढली आहे तर पेट्रोलचे भावही गगनाला भिडले आहेत. वीज दर वाढ होऊ घातली आहे. उद्योग, रोजगाराची केवळ आश्वासने देऊन दुसरीकडे महागाई वाढवली जात आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही. महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणायचा असे करून सरकार महागाई पासून जनतेचे लक्ष विचलित करू पाहत आहे.

महागाई मुळे जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील खिचडीचे आंदोलन छेडत गॅस दरवाढ व महागाईचा निषेध करत आहोत.

मोदी सरकारने उज्वला गॅस योजना राबवून घराघरात गॅस सिलेंडर दिले, मात्र त्याच गॅसद्वारे लूट करून सरकार तोंडातील घास हिरावून घेणार याची कल्पना जनतेला नव्हती. मात्र जनता निवडणुकीत लोकशाही मार्गाने सरकारच्या गळ्याचा फास आवळल्याशिवाय गप्प बसणार नाही, आजचे आंदोलन यापुढेही व्यापक प्रमाणात करून सरकारच्या विरोधात जिल्हाभरात रान पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खोबरेकर यांनी यावेळी दिला.

नितीन वाळके म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उघडे पडले आहे. पेट्रोल, गॅस सिलेंडर व वीज दरवाढ जनतेच्या सहनशीलते पलीकडची आहे. महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामुळे या विरोधात व्यापक स्वरूपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!