*कोकण Express*
*मराठीचा आग्रह हाच भाषेचा विकास*
*डॉ. विष्णू फुलझेले*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्याच्या अध्यक्ष स्थानावरून महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले बोलत होते. मराठी भाषेवर अनेक भाषांचे आक्रमण झाले आहे. सहज बोलण्यातही आपण अनेक भाषांचे मराठीत उच्चारत असतो आणि त्यामुळे मराठीवर अन्याय होत आहे. इंग्रजीच्या पूर्वीपासून मराठीची उत्पत्ती सापडते. त्यामुळे मराठीचा इतिहास खूप खोल आहे. मराठीतील साहित्य समृद्ध आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या साहित्यात अस्सल मराठीचा सुगंध येतो. त्यांची नाट्य तथा कविता साहित्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे साहित्य वाचताना अस्सल मराठीचा आविष्कार असतो. असे प्रतिपादन केले.
भाषा दिनाच्या निमित्ताने बोलताना मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश कामत म्हणाले की भाषा संवर्धन हा काही एकट्याचा भाग नाही. सर्वांनीच ते काम केले पाहिजे. बरेच इतर शब्द मराठी भाषेत आले. तरी ते मराठी भाषेने स्वतःचे म्हणून स्वीकारले आहेत. त्या शब्दांना मराठीचे शब्द म्हणून संबोधले जाते. त्यामुळे या प्रकारामुळे मराठी मरेल हे शक्य नाही. जोपर्यंत महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची माती आहे, मराठी माणूस आहे तोपर्यंत मराठी भाषा जगणार आहे. त्यासाठी गरज आहे ती मराठीचा आग्रह धरण्याची शासन दरबारी प्रयत्न करणारे प्रयत्न करतीलच परंतु आपण संभाषणात मराठी स्वीकारली तरीही मराठी बद्दलचे समज गैरसमज दूर होतील. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी गौरव गीत गायन केले. त्याचबरोबर गांधी विचार संस्कार परीक्षेच्या प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. जगदीश राणे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.