भाजपमधील सोंगाड्यांनी सांगाड्यांवर बोलू नये – हरी खोबरेकर

भाजपमधील सोंगाड्यांनी सांगाड्यांवर बोलू नये – हरी खोबरेकर

*कोकण Express*

*भाजपमधील सोंगाड्यांनी सांगाड्यांवर बोलू नये – हरी खोबरेकर*

*मालवण ः प्रतिनिधी*

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवणसाठी सातत्याने निधी मंजूर होत असल्याने गेली २५ वर्षे नगरध्यक्ष व नगरसेवक पद भोगणाऱ्या सुदेश आचरेकर यांना आपल्या काळात मालवण साठी निधी न आणल्याचे शल्य असल्यानेच ते टीका करून निलेश राणे यांनी निधी आणल्याचे सांगत आहेत. जे निलेश राणे आपल्या खासदारकीच्या पाच वर्षात मालवणसाठी काही करू शकले नाहीत ते आता काय करणार आहेत ? विकासाच्या सांगाड्यांवर मांस पण आम्हीच चढविणार आहोत. त्यामुळे भाजप मधील सोंग घेण्याचे काम करणाऱ्या सोंगाड्यानी सांगाड्यांवर बोलू नये, अशी खरमरीत टीका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालवण शहरासाठी निलेश राणे यांच्या माध्यमातून ६ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी ठाकरे गटावर तसेच आमदार खासदार यांच्यावर टीका केली होती. त्यास आज शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, यतीन खोत, सन्मेष परब, मंदार ओरसकर, मनोज मोंडकर, नरेश हुले, उमेश मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अथक प्रयत्नातून शहराला निधी प्राप्त झाला. जिल्हा नियोजनच्या यादीत मालवण शहरातील सुचविलेल्या कामांना निधी मिळाला असून त्या कामांची शिफारस आमदार वैभव नाईक यांनी केली होती. आम. नाईक व खास. राऊत हे जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी संसदेत कोकणातील किती प्रश्न मार्गी लावले? निधी आणायला निलेश राणे हे जिल्हा नियोजन समितीमध्ये आहेत का ? याची माहिती प्रथम भाजपच्या मंडळींनी घ्यावी. तरीही निधी आम्हीच आणला हे सांगण्याची धडपड सुदेश आचरेकर व त्यांची मंडळी करत असून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, अशी टिकाही खोबरेकर यांनी केली. तसेच खास. विनायक राऊत यांचा टॉप टेन खासदारांमध्ये समावेश झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस आचरेकर यांनी करू नये, असेही खोबरेकर म्हणाले.

दांडी येथील बंधाऱ्याच्या विषयावरूनही भाजपकडून राजकारण केले जात आहे. बंधारा कसा बांधला जातो, त्यासाठीच्या परवानग्या काय याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना नाही. दांडी बंधारा होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सेजल परब, तृप्ती मयेकर, पंकज सादये, सन्मेष परब, तपस्वी मयेकर यांनी प्रयत्न केले आहेत. या बंधाऱ्याचा सर्व्हे आम्ही स्वतः अधिकाऱ्यांसोबत हजर राहून करून घेतला आहे. बंधाऱ्यासाठी सर्व्हे, कागदपत्रे, सातबारा आदी गोष्टींची पूर्तता कोणी केली हे स्थानिक नागरिकच सांगतील. स्थानिक नागरिकांना हवा तसा बंधारा बांधण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत, असेही खोबरेकर म्हणाले. २५ वर्षात मालवणचा विकास झाला नाही तो गेल्या ५ वर्षात झाला आहे. शहरातील जास्तीत जास्त कामे आमच्या प्रयत्नातून झाल्याने त्याचे शल्य सुदेश आचरेकर व भाजप मंडळींना आहे. शहराचा विकास थांबणार नाही, असेही खोबरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!