*कोकण Express*
*जिल्ह्यातील तलाठ्यांवर अतिरीक्त कार्यभार, लोकांची कामे “रामभरोसे”…*
*गोरगरिबांची हेळसांड नको, योग्य ते नियोजन करा; भाजपाच्या रफीक शेख यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील बर्याच गावातील तलाठ्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच ते सहा गावांचा अतिरीक्त कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे कामं करायची कशी? असा प्रश्न संबधित तलाठ्यांवर पडला आहे. तर दुसरीकडे तलाठीच नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान अशा प्रकारे एकाच तलाठ्याकडे अतिरीक्त चार्ज दिल्यानंतर गोरगरीबांची कामे होणार नाहीत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासंदर्भात लवकरात लवकर उपाय योजना करा. ते शक्य नसल्यास ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सेवा द्या. अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष रफिक शेख यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ते म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत तलाठ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. काही तलाठ्यांकठे अतिरीक्त कार्यभार दिला जात आहे. पिंगुळी येथील एका तलाठ्याकडे सहा गावे देण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांची कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्या ग्रामीण भागातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः वृध्द आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अन्यथा ते शक्य नसेल तर ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून लोकांना सेवा देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी किंवा कंत्राटी पध्दतीवर कर्मचारी नेमून लोकांना सेवा देण्यात यावी, अशी मागणी आपण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.