*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे पालक शिक्षक सभा संपन्न झाली. सभेला पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
सभेला संबोधित करताना विभाग प्रमुख डॉ.सतीश कामत यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. त्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना जीवनात होणारा उपयोग समजून सांगितला. विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यातील समन्वय फार महत्त्वाचा असतो आणि हा समन्वय अशा सभांमधून साधला जातो. असे प्रतिपादन केले.
प्रा. विनोद पाटील पालकांना संबोधित करताना म्हणाले की महाविद्यालयात अनेक विभाग चालवले जातात. या विभागामार्फत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्या विभागात आपला पाल्य सहभागी आहे का?,तो सराव करतो का? अशा गोष्टींचा आढावा पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घर ते महाविद्यालय या मधल्या कालावधीत पाल्य काय करतो? याकडेही पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले.
त्यानंतर श्री. मंगेश जाधव, श्री. सतीश चव्हाण या पालकांनी विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची होणारी अडचण एस.टी. महामंडळाशी बोलून दूर करण्याची विनंती केली.
डॉ. सुरवसे व डॉ. ताडेराव यांनी आपल्या विभागाची व त्या विभागात असणाऱ्या शिस्तीचे महत्व पटवून सांगितले. श्री. प्रदीप कामतेकर म्हणाले की हे महाविद्यालय विद्यार्थी उपयोगी आहे. अनेक प्राध्यापकांचा पालकांशी थेट संबंध आहे व ही समाधानाची बाब आहे. संस्थेचे आणि पालकांचेही फार जवळचे संबंध आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विष्णू फुलझेले म्हणाले की आपण सर्व सुज्ञ पालक आहात. पाल्याची प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आपण सभेला उपस्थित राहिलात. भविष्यातही अशा सभांना आपला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. तुमच्या पाल्यांच्या समस्या आम्हाला समजण्यासाठी आपण संपर्क राहिला पाहिजे. पालक शिक्षकांच्या संपर्कात आहे असे समजले तरी विद्यार्थी दचकून राहतो. आमच्यातल्या त्रूटी सांगितल्या तरी आम्ही त्याचे स्वागत करू, असे प्रतिपादन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष सावंत म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर आपण लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे. ज्ञान मिळवण्यासाठी तो मोबाईल वापरत असेल तर ठीक आहे. अन्यथा त्याचे परिणाम वाईट आहेत. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा तो आयुष्य उध्वस्त करणारा आहे. मोबाईलमुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. महाविद्यालयातील उपक्रमामुळे किमान शरीराची हालचाल तरी होते. पालकांनी आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत समस्या सांगितल्या तरच आम्हाला समजतील व त्या सोडवण्याचा कसोशीने आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन केले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कामत यांनी तर आभार डॉ. राजाराम पाटील यांनी मानले. सभेला पालकांचा प्रतिसाद मोठा होता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

