*कोकण Express*
*सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली ; दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू*
*निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला*
*दिवसाढवळ्या पत्रकाराची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक*
*भ्याड हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध:-सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर*
*रत्नागिरी ः प्रतिनिधी*
प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली होती.त्यानंतर एका पत्रकराचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.सोमवारी राजापूर येथे झालेल्या थार वाहन आणि दुचाकी अपघातात जखमी झालेले पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मात्र, या अपघातात आता वेगळी बाजू समोर येऊ लागली आहे. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे या पत्रकाराच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.
काय आहे घटना?
सोमवारी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. ‘मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीसे यांनी सकाळी टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात ही बातमी होती.यानंतर दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र,मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष आहेत.
नातेवाईकांचा आरोप
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रत्नागिरी येथील पत्रकारांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनीही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे.तर या प्रकाराची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशीही मागणी श्री खवणेकर यांनी केली आहे.