*कोकण Express*
*वैभववाडीतील तेराही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार …*
*नितेश राणे; नापणे बोरचीवाडी- कोकिसरे रस्ता कामाचा शुभारंभ…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास भाजपच्या माध्यमातून झाला आहे. जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचे तसेच वचनपूर्तीचे काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करण्यात आले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायत निवडणुकीत वैभववाडी तालुक्यात भाजपाचा झेंडा फडकेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ग्राम सडक मधून मंजूर असलेल्या नापणे बोरचीवाडी-कोकिसरे खांबलवाडी रस्ता कामाचा शुभारंभ नापणे येथे संपन्न झाला. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पं.स.सभापती अक्षता डाफळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, सरपंच जयप्रकाश यादव, शक्ती केंद्रप्रमुख प्रदीप नारकर, प्रदीप जैतापकर, अवधूत नारकर, उपसरपंच सौ. सुर्वे, नर गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक ही योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली होती. मंजूर कामाचे श्रेय घेण्यासाठी आता विरोधक पुढे येऊ लागले आहेत. हा महत्त्वपूर्ण रस्ता भाजपाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. दुसऱ्या वेळी सुद्धा आपण मला भरघोस मतांनी निवडून दिलात. त्यामुळे आता तुम्ही निवांत राहा. विकासाची चिंता करू नका. उर्वरित सर्व कामे मार्गी लावण्याची जबाबदारी ही माझी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पुढील काळात मोठे रस्ते मार्गे लागणार असल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले. मात्र विकास करत असताना संबंधित गावची ग्रामपंचायत व सरपंच हा भाजपा विचारसरणीचा असला पाहिजे. तुम्ही सरपंच द्या, विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे सांगितले.