*कोकण Express*
*कोकण रेल्वेला सापत्नपणाचा ठेंगा*
*साडेचार तास उशिराने धावणार्या कोकणकन्येला दोन तास लाल सिग्नल*
*प्रवाशांना फटका – भाई चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मडगाव-मुंबई हि कोकणकन्या ७ डिसेंबरला मुळात साडेचार तास उशिराने धावत होती. मात्र ठाणेहून निघालेल्या या गाडीला अन्य विभागाच्या बाहेरील रेल्वे गाड्यांना पुढे जाण्यासाठी घाटकोपर येथे तीन वेळा लाल सिग्नल देऊन सुमारे दोन तास थांबविण्यात आले. या विलंबाचा फटका येत्या काही दिवसांत कोकणकन्यासह मांडवी गाडीच्या प्रवाशांना बसणार आहे. मध्य रेल्वे विभागाने पुन्हा एकदा कोकण रेल्वेला सापत्नपणाचा ठेंगा दाखविला असल्याचा आरोप या गाडीतून प्रवास करणारे कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी केला आहे.
मुंबईहून मडगावला जाणार्या कोकणकन्या गाडीचे इंजिन ७ डिसेंबरला वैभववाडी येथे बंद पडले. परिणामी मडगावहून मुंबईकडे निघणारी ही गाडी साडेचार तास विलंबाने धावत होती, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, ही गाडी ८ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ठाणे येथे पोहचली. मात्र पुढे घाटकोपर येथे ही गाडी एकदा मधल्या , तर दोन- तीनदा कडेच्या ट्रकवर लाल सिग्नल देऊन थांबविण्यात आली. या दरम्यान मात्र पर राज्यांतून मुंबईत येणार्या मध्य रेल्वेच्या बर्यांचश्या गाड्यांना पुढे जाण्याचा हिरवा सिग्नल देण्यात येत होता. यावरूनच मध्य रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे गाड्यांकडे सापत्नपणे पहात असल्याचे स्पष्ट होते. गाडीतील वेटरनेही या बाबीला पृष्ठता दिली.
*चौकट*
ठाणे ते दादर या प्रवासाला या कोकणकन्येला तब्बल सव्वा दोन तास लागले. दुपारी सव्वा अकरा वाजता ही गाडी दादरला पोचली. त्यामुळे नोकरदार वर्गांला कार्यालयात दांडी मारणे भाग पडले.
मांडवी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन सकाळी ७.१० वाजता सुटते. कोकणकन्या मांडवी म्हणून माघारी परतते. मात्र सिग्नलच्या घोळामुळे ही सुमारे पाच तास विलंबाने धावणार आहे. त्याचा परिणाम काही दिवस तरी वेळापत्रक कोलमडणार आहे