दिगंबरा दिगंबरा…भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषात निघाली बाबांची पालखी मिरवणूक

दिगंबरा दिगंबरा…भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषात निघाली बाबांची पालखी मिरवणूक

*कोकण Express*

*दिगंबरा दिगंबरा…भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषात निघाली बाबांची पालखी मिरवणूक…!*

विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या आळंदी, देहुतील पालखीचा आला प्रत्यय…!

अमृतनाथ नाट्यमंडळ, म्हापण यांचे कुर्मदासाची वारी या नाटकाने होणार उत्सवाची सांगता…!

कणकवली 

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी दिन आज संस्थानमध्ये भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत आणि विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. आज जिल्हयाच्या कानाकोपर्‍यातून तसेच वेगवेगळया भागातून आलेल्या भाविक भक्तांची मोठी गर्दी केली होती. सायंकाळी दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा, पायी हळू हळू चाला… मुखाने भालचंद्र बोला…भालचंद्र महाराज की जय…अशा जयघोषात परमहंस भालचंद्र महाराज यांची कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात अबालवृद्ध, भाविक भक्तगण मोठया संख्येने सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात, फटक्यांच्या आतिषबाजीत आणि भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष करत निघालेल्या पालखीने सर्वांच्याच डोळयाचे पारणे फिटले.

भालचंद्र बाबांचा पुण्यतिथी महोत्सव गेले पाच दिवस मोठया दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. दर दिवशी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. पहाटे काकड आरती पासूनच भाविकांची समाधी दर्शनासाठी रांग लागत असे ती रात्री उशिरापर्यंत असे. आज बाबांचा ४५ वा पुण्यतिथी दिन हजारो भाविक भक्तांच्या मांदीयाळीत साजरा झाला. पहाटे समाधीपूजन, काकडआरती नंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तद्नंतर समाधीस्थानी मन्यूसूक्त पंचामृताभिषेक तसेच बाबांच्या समाधीस्थळी किरणोत्सव पार पडला. चंदनाच्या लेपात बाबांच्या बाळ मूर्तीसोबत संस्थान परिसरातील देवतांची भेट घेत पुन्हा समाधी स्थळी बाबांची मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर दुपारी भालचंद्र महाराज यांची महाआरती झाली. यावेळी भाविकांचा महासागर लोटला होता. त्यानंतर हजारो भाविकांनी शिस्तबध्दरित्या महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले.

सायंकाळी उंट, घोडे यांच्यासमवेत वारकरी व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भालचंद्र महाराज संस्थानकडून भालचंद्र महाराज यांच्या पालखी मिरवणूकीस सुरुवात झाली. हा पालखी सोहळा जणू काही विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या आळंदी व देहुतील पालखी सोहळ्यासारखा भासत होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ज्याप्रमाणे रथ असतो, तशाच प्रकारचा रथ भालचंद्र महाराजांच्या पालखी मिरवणूकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ही पालखी मिरवणूक पटकीदेवी, ढालकाठी, तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवधर्वन चौक, बाजारपेठ मार्गे संस्थानात दाखल झाली. पालखी सोहळ्यात वारकरी व भक्तांनी भालचंद्र महाराज यांच्या नामाचा जयघोष केला. पालखी मिरवणुकीनिमित्त संपूर्ण पालखी मार्ग सडा रांगोळयांनी सजवण्यात आला होता. अनेक ठिकाणी पालखीतील भाविकांसाठी सरबत आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच अवघी कणकवली बाबांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पालखी संस्थानमध्ये गेल्यानंतर आता रात्रौ दैनंदिन आरती पार पडणार आहे. त्यानंतर अमृतनाथ नाट्यमंडळ, म्हापण यांचे कुर्मदासाची वारी हे नाटक सादर होणार आहे . हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी आर्तीपासूनच गर्दी एकूणच भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याची संधी भाविक भक्तांना मिळाली. विविध भागातून आलेल्या लाखो भक्तांनी पाच दिवस समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. पहाटे काकड आरतीपासून ते रात्रीच्या आरतीपर्यंत सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. किर्तन महोत्सवालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भालचंद्र बाबांच्या भक्तांनी या उत्सवात मोठया संख्येने सहभागी होऊन बाबांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. हा सोहळा सर्वांसाठीच संस्मरणीय असाच ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!