*कोकण Express*
*समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना जाहीर*
*समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाहक वैभव साटम यांची माहिती*
*जानेवारी 2023 मध्ये पुरस्काराचे सावंतवाडीत वितरण*
*कणकवली/प्रतिनिधी*
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर ( वेंगुर्ले -केळुस) पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक नीतीन रिंढे, रणधीर शिंदे आणि कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या निवड समितीने सदर पुरस्कारासाठी सुबोध मोरे यांची निवड केली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह साठम यांनी दिली.
प्रसिद्धीपासून दूर राहून सतत कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुबोध मोरे यांचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते. दलित पॅंथरला पन्नास वर्षेपूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात
विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री मोरे यांनी पुढाकार घेतला होता. “चळवळीवरची निष्ठा आणि नाही रे वर्गाबद्दलची आस्था” याच्या केंद्रस्थानी राहून सुबोध मोरे कार्यरत असल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान अलीकडल्या काही वर्षात सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवत असून या उपक्रमांबरोबरच थोर इतिहासकार सिंधुदुर्ग सुपुत्र गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सामाजिक किंवा साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीला दिला जातो. गेल्यावर्षी हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना देण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी या पुरस्कारासाठी सुबोध मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. इतिहासकार केळुसकर यांनीच प्रथम शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले आणि गौतम बुद्धाचेही चरित्र लिहिले. ही दोन्ही चरित्र त्यांचे विद्यार्थी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराच्या वेळी त्यांना केळुस्कर यांनी दिल्यावर बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन केळुस्कर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण जानेवारी 2023 मध्ये केले जाणार असल्याची ही माहिती श्री मातोंडकर आणि श्री साटम यांनी दिली.

