सिंधुदूर्गातील ‘गावपळण’ला सुरुवात, गुराढोरांसह गावकरी तीन दिवस वेशीबाहेर;600 वर्षांची परंपरा

सिंधुदूर्गातील ‘गावपळण’ला सुरुवात, गुराढोरांसह गावकरी तीन दिवस वेशीबाहेर;600 वर्षांची परंपरा

*कोकण Express*

*सिंधुदूर्गातील ‘गावपळण’ला सुरुवात, गुराढोरांसह गावकरी तीन दिवस वेशीबाहेर;600 वर्षांची परंपरा*

*सिंधुदूर्ग*

कोकणातील एक अनोखी आणि आगळी वेगळी परंपरा म्हणजे ‘गावपळण’. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात ही परंपरा सुरू आहे. रवळनाथाच्या कौलाने दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात चिंदर गावची गावपळण ही परंपरा सुरू होते. चिंदर गावात गावपळणीला दुपारनंतर सुरुवात होते. गावकरी गुराढोरांसह तीन दिवस वेशीबाहेर निघाले आहेत. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होणार आहे.

आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी चिंदर गाव आजच्या विज्ञान युगातही गावपळण परंपरा पाळत गावाबाहेर जातं. कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने गावाबाहेर जातात. दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा कौल प्रसाद घेतला जातो. त्यानंतर गावपळणीला सुरुवात होते.

‘चिंदर गावची गावपळण करण्यास रवळनाथाची परवानगी आसा काय?’, असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून भटजींना विचारुन तारीख ठरवतात. त्यानंतर गावच्या देवाला कौल लावला जातो. देवाने कौल दिला की, गावकरी गाव सोडून वेशीबाहेर राहुट्या उभारून राहतात. तीन दिवस तीन रात्री भजन, फुगड्या खेळत मजेत आनंदाने घालवतात.

600 वर्षाची ही गावपळण परंपरेनिमित्त देवाच्या कौलाने चिंदर गाव सुट्टीवर गेलं आहे. या गावात पाच ते सात हजार लोकसंख्या आहे. सर्व धर्मीय या परंपरेला मानून गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गावकरी मोठ्या उत्साहाने पूर्ण गाव खाली करत रानावनात वेशीवर झोपड्यांमध्ये राहतात. गावपळणीला काहीजण श्रद्धा म्हणून पाहतात. मात्र चिंदर वासीय गावपळण म्हणजे गावाच्या ग्रामदेवताने दिलेला एक कौल म्हणून मानतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!