महामार्गावर अपघात; कलमठचा युवक ठार : दुचाकी रस्त्याच्या डायव्हर्शनला लावलेल्या पत्र्यावर आदळून अपघात

महामार्गावर अपघात; कलमठचा युवक ठार : दुचाकी रस्त्याच्या डायव्हर्शनला लावलेल्या पत्र्यावर आदळून अपघात

*कोकण Express*

*महामार्गावर अपघात; कलमठचा युवक ठार : दुचाकी रस्त्याच्या डायव्हर्शनला लावलेल्या पत्र्यावर आदळून अपघात

*कणकवली  ः प्रतिनिधी*

महामार्गावर चौपदरीकरणाच्या डायव्हर्शनसाठी लावलेल्या पत्र्याला दुचाकीची धडक बसून कलमठ येथील बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर, वय २७ हा युवक ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री जानवली-बौद्धवाडी येथे महामार्गावर घडला. अपघातानंतर एका रिक्षेतद्वारे बाबाजी याला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी त्याला पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
बाबाजी हा जानवलीहून कलमठकडे घराच्या दिशेने येत असताना महामार्गावर बौद्धवाडी येथे ओढ्यालगत लावलेल्या पत्र्याला त्याच्या दुचाकीची धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की, यात बाबाजी तेथील ओहोळात फेकला गेला. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. मागील कित्येक दिवस जानवली बौद्धवाडी येथे महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन सुद्धा महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीला जाग येत नसल्याने प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाबाजी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळतात मंगळवारी रात्री भाजपाचे युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, गुरुनाथ वर्देकर, सुरेश वर्देकर यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!