*कोकण Express*
*रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना का आणला नाही?*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या युवकांच्या दृष्टीने रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी का आणला नाही? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ.जयेंद्र परूळेकर यांनी उपस्थित केला.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिली असून त्यात असे नमूद करण्यात आले की प्रदूषणकारी प्रकल्प यादीत असलेला रिफायनरी प्रकल्प सिंधुदूर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणणे हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने शहापणाचे ठरणार आहे का? असा सवाल करून गप्पा मारणे सोपे मात्र विकास घडविणे कठीण आहे, असेही त्यांनी सुनावले आहे. याबाबत श्री. परुळेकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, गेले दोन दिवस सुरेश प्रभू सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. सामाजिक संस्थांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “शाश्वत विकासच सर्वसामान्यांना तारेल” असं जाहीर विधान केलं.
आता प्रभू यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने असा सवाल आहे की बारसू सोलगाव येथे प्रस्तावित जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प हा “शाश्वत विकास प्रक्रिया” वृध्दिंगत करणारा प्रकल्प आहे की येथील जनतेचे जीवनमान तारण्या ऐवजी उध्वस्त करणारा प्रकल्प आहे?प्रदुषणकारी प्रकल्प यादीत “रेड कॅटेगरी इंडस्ट्री” मध्ये अग्रस्थानी असणारा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणणे हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने शहाणपणाचे ठरेल काय? दोन चार आठवड्यांपूर्वी देवगड नजिक एक तेलवाहू जहाज बुडालं आणि कित्येक किलोमीटर त्या तेलाचा तवंग किनारपट्टीवर दिसून आला, मच्छीमारांचे मोठं नुकसान झालं मग लाखो टन कच्च्या तेलाची मोठमोठी जहाजे जेव्हा पेट्रोकेमिकल रिफायनरी मध्ये तेल शुद्धीकरणासाठी या किनाऱ्यावर येणार तेव्हा येथील मच्छीमारी उद्योग जिवंत तरी राहिल का? मग या प्रकल्पामुळे या दोन जिल्ह्यातील जनतेचा विकास शाश्वत राहील की अशाश्वत?सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या युवकांच्या दृष्टीने रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी का आणला नाही?१५००० प्रत्यक्ष आणि ४०००० अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला रेल्वे कारशेड प्रकल्प (जो लातूरला गेला) सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला असता तर ज्या राजापूर मतदारसंघातील जनतेने सुरेश प्रभू यांना एक दोन वेळा नव्हे तर तब्बल चार वेळा निवडून लोकसभेत पाठवले त्या भागातील बेरोजगारीची समस्या कायमची मिटली असती.शाश्वत विकासाच्या गप्पा मारणे आणि भाषणं ठोकणं सोपं असतं पण त्यादृष्टीने विकास घडवणं कठीण असतं हे केंद्रातील अनेक मंत्री पदं उपभोगलेल्या प्रभू यांना माहीत असणे आवश्यक आहे.असे त्यांनी त्यात म्हटले आहे.