*कोकण Express*
*महाराष्ट्र चेंबरच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन*
*रत्नागिरी ःःप्रतिनिधी*
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर व पर्यटन समितीचे चेअरमन संतोष तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवार दि. ८ ऑक्टोबर ला झाले. महाराष्ट्र चेंबर व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असून कोकणातील व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य होईल व त्यासाठी चेंबरला आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
सुरुवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वागत केले व महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती देऊन वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चेंबरचे कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयानुसार आज रत्नागिरी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करून कोकणातील व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे उपक्रम राबवून व तरुणांना, महिलांना व्यापार उद्योग करण्यासाठी कौशल्य विकास व शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रोत्साहित करण्याचे कार्य महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यकारणी सदस्य मनोज वालावलकर, राजन नाईक, अजित शिराळकर आदींसह महाराष्ट्र चेंबरचे सदस्य व उद्योजक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

