मी जनतेचा सेवक, आराखडा अन्यायकारक असल्यास मंजुरी नाही – समीर नलावडे

मी जनतेचा सेवक, आराखडा अन्यायकारक असल्यास मंजुरी नाही – समीर नलावडे

*कोकण Express*

*मी जनतेचा सेवक, आराखडा अन्यायकारक असल्यास मंजुरी नाही – समीर नलावडे*

…तर समिती सदस्य म्हणून राहण्यात स्वारस्य नाही…!

बैठकीत नगरसेवक सुशांत नाईक आक्रमक…!

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

कणकवली शहराच्या प्रस्तावित सुधारित विकास आराखडयासाठी बुधवारी सायंकाळी नगरवाचनालयाच्या सभागृहात अनेक नागरिकांनी आपल्या सुचना आणि हरकती मांडल्या. यावेळी अनेकांनी अन्यायकारक असलेली आरक्षणे नवा आराखडा बनवताना उठवावीत अशी जोरदार मागणी केली. यावेळी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांनी नागरिकांच्या सुचना, हरकतीबाबत नगरविकास विभागाचे अधिकारी गांभीर्याने विचार करणार नसतील तर त्या समितीत राहण्यास आपणास अजिबात स्वारस्य नाही अशा सुचना मांडून उपयोग काय असा सवाल उपस्थित करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पीएलयू आराखडा प्रसिध्द झाल्यानंतर तो पुन्हा जनतेसमोर मांडू. जनतेच्या सुचना, हरकती आल्यानंतर पीएलयूला मान्यता देऊ. मी जनतेचा सेवक असून आराखडा अन्यायकारक असेल तर नगराध्यक्ष म्हणून आपण व नगरसेवक त्या आराखडयाला मंजूरी देणार नाही असा विश्वास कणकवलीकरांना दिला.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे, नगररचना सहाय्यक संचालक व्ही.टी. देसाई, विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यासह शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. विद्याधर तायशेटे यांनी तायशेटे कुटुंबियांच्या जमिनीवर चार ठिकाणी पुर्वी आरक्षणे पडलेली आहेत. त्यातील विकसित न झालेली आरक्षणे मोकळी करा अन्यथा त्याचे क्षेत्रफळ कमी करता येईल का याचा विचार करा अशी सुचना केली. अनिल डेगवेकर यांनी सर्व्हे नं. 115 मध्ये आपल्या जमिनीत आरक्षण असल्याने आपण घर बांधू शकलो नाही. एकतर ती जागा विकत तरी घ्या किंवा मोकळी करा अशी मागणी केली. उमेश वाळके यांनी मुडेडोंगरी येथील आपल्या जमिनीत 99 पुर्वी एमटीडीसीचे आरक्षण होते, 99नंतर स्टेडीयमचे आरक्षण पडले. आता त्यातील काही जमिन स्टेडीयमसाठी घेतली जाणार असून उर्वरित जमीनीचे काय करणार असा सवाल केला. आपली सर्व जागा यलो झोन करण्याची मागणी केली. तेथीलच श्री. राणे यांनीही आपल्या जमीनीत 40 वर्ष आरक्षण पडले असून जमीन मालक म्हणून आम्हाला त्या जागेचा फायदा काय असा सवाल केला. सुजीत जाधव यांनी शहरातील अनेक घरांवर आणि अनेक एनए प्लॉटवर आरक्षण पडले आहे त्याबाबत काय निर्णय घेणार? ते स्पष्ट करण्याची मागणी केली. डॉ. संदीप नाटेकर यांनी तुम्ही नागरिकांकडून आराखडयाबाबत सुचना, हरकती घेत आहात पण त्यानुसार काय बदल केले ते लोकांना सांगणार आहात की नाही असा सवाल केला. नगररचनाकार श्री. देसाई यांनी नागरिकांच्या सुचना विचारात घेऊन पीएलयू आराखडा बनवला जाणार असून तो नगरपंचायत बॉडीसमोर ठेवल्यानंतरच अंतीम केला जाणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष नलावडे यांनी नगररचना विभागाकडून पीएलयू आल्यानंतर तो जनतेसमोर मांडू त्यानंतर जनतेच्या हरकती, सुचना पुन्हा घेऊ, तो आराखडा सर्वांना पटला तरच मान्यता देऊ असे स्पष्ट केले. नगरसेवक कन्हैया पारकर यांनी विरोधी पक्षाचे सदस्य कायदयाप्रमाणे समितीत घेता येतात का? अशी विचारणा नगररचनाकारांना केली. त्यावेळी त्यांनी शासनाचे चार सदस्य आणि अस्थायीचे चार सदस्य समितीत असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष नलावडे यांनी आमची भुमिका प्रामाणिक आहे, आम्ही जनतेसोबत आहोत, जनतेला विश्वासात घेऊनच आराखडा अंतिम केला जाईल असे स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी 20 वर्षात नगरपंचायत किती आरक्षणे विकसित करु शकेल याचा विचार करुनच तेवढीच आरक्षणे ठेवण्याची मागणी केली. यावेळी अँड.विराज भोसले,नगरसेवक अभिजित मुसळे, रुपेश नार्वेकर,अँड प्रवीण पारकर,भाई परब,भाई जाधव,मनोज कोदे महानंद चव्हाण,उन्मेश राणे, आप्पा कदम, भाई परब,विलास कोरगावकर,सुशील आळवे गणपत चव्हाण,मनोहर पालियेकर, आदींनी सुचना मांडल्या. काहींनी यलो झोन टाकताना जोड रस्ता प्रस्तावित करा आणि मगच यलो झोन मध्ये टाका अशी सुचना केली. रोहन रगजी, गितेश मुरकर, सोहम
वाळके, श्रीकृष्ण निकम, , डॉ. विजय तावडे,महेश कोदे, उदय सबनीस, मनोहर पालयेकर, उन्मेश राणे, सचिन सरंगले, मधुकर कदम, गुरुप्रसाद राणे यांच्यासह कणकवलीतील नागरिक, न.पं. कर्माचारी आदी उपस्थित! यावेळी काहींनी महामार्गावर स्वच्छतागृह, पार्किंग सुविधा करण्याची मागणी केली.

…तर समिती सदस्य म्हणून राहण्यात स्वारस्य नाही – सुशांत नाईक

विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी नगररचनाकार श्री. देसाई यांना मुळात तुम्ही लोकांच्या ज्या सुचना आहेत, आरक्षणाबाबत त्यांच्या ज्या हरकती आहेत त्याबाबत सर्व्हे केला का? माहिती घेतली का? कुठे डीपी रोड व्हायला हवे? कोणाच्या घरांवर आरक्षण पडले आहे? याची माहिती तुम्हाला आहे का? असा सवाल करत त्यांना धारेवर धरले. जर आराखडयाबाबत मांडलेल्या सुचना व हरकतींचा विचार गांभीर्याने होणार नसेल तर त्या समितीत राहण्यास आपणास अजिबात स्वारस्य नाही अशी भुमिका स्पष्ट केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तुम्ही आराखडा समितीत आहात, नागरिकांच्या सुचनांचे पालन झाल्याशिवाय पीएलयूला मंजुरी देणार नाही. चुकीचे होत असेल तर बॉडीचा ठराव देणार नाही. काही अन्यायकारक होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट केले.

दरम्यान, सदर सभेत स्पीकर (ध्वनी प्र.) नियोजन नीट नसल्याने काही लाईन मागे बसलेल्या उपस्थितांना समोर काय चालले हेही समजने अवघड वातल्याने त्यांनी आपल्या सूचना न मांडताच काढता पाय घेतले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!